चाईल्ड लाईन व घारगाव पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह!
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लग्नासाठी मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्षाच्या वर असणे कायद्याने बंधनकारक आहे. लहान वयात मुलीचे लग्न केले तर भविष्यात तिला अनेक शारिरीक व्याधीना सामोरे जावे लागते. त्यामुळे वयात आल्यानंतरच लग्न करणे हे नवदामप्त्यांसाठी आवश्यक असते. परंतु आजही काहीजण मुलीचा विवाह लहान वयातच करुन आपली जबाबदारी पार पाडल्याचे समजत आहेत. असाच होणारा एक बालविवाह अहमदनगर चाईल्ड लाईन व घारगाव पोलिसांच्या मदतीने शनिवारी (ता. 29) होणारा विवाह थांबविण्यात आला. यावेळी मुलीच्या पालकांचे व उपस्थितीतांचे समुपदेशन करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील बीरेवाडी एका 15 वर्षीय बालिकेचा बालविवाह होत असल्याची माहिती अहमदनगर चाईल्ड लाईनच्या 1098 या मोफत हेल्पलाईन वर प्राप्त झाली. चाईल्डलाईने ही बाब घारगाव पोलीस स्टेशन, जिल्हा महीला व बाल विकास अधिकारी, बालकल्याण समिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला कळविली. यानंतर हा बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, आणि चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक महेश सुर्यवंशी या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड लाईन टीम मेंबर प्रविण कदम , राहुल कांबळे आणि ऊउझण सर्जेराव शिरसाठ या टीम च्या समन्वयाच्या सहकार्यांच्या मदतीने ग्रामसेवक नितीन पवार, पोलीस नाईक संतोष खैरे, अंगणवाडी सेविका सुभद्रा गळंगे यांनी बीरेवाडी गाव गाठून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. सदर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी(ग्रामसेवक) यांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांकडून लेखी जबाब घेतले आणि त्यांना सोमवारी बाल कल्याण समिती समोर हजार राहण्याची नोटीस बजावली आहे.
जागृत नागरिकांनी याबाबत चाईल्ड लाईन च्या 1098 या टॉल फ्री नंबरवर माहिती दिल्यास असे बालविवाह उधळून लावता येतील आणि एका निष्पाप जीवाची सुटका करता येईल.आपले नाव गुपनिय ठेवले जाईल असे आवाहन चाईल्ड लाईन चे केंद्र-समन्वयक महेश सूर्यवंशी हे करत आहे.
No comments:
Post a Comment