नगरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, एकाच कुटुंबातील तिघे ठार..
अहमदनगर : नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहे. जखमीतील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.नगर कल्याण महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास दोन कार आणि एक मालवाहतूक करणारा टेम्पो यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ईरटीका कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्ती या मुंबईच्या कळंबोली भागातील असल्याची माहिती मिळत आहे. कळंबोलीहून नगरच्या दिशेने ईरटीका कारमधून प्रवास करणार्या भावसार कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.प्रीती भावसार, वेदांत भावसार आणि कारचालक रोशन या तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका विचित्र होता की मालवाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला असून दोन्ही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि जखमींना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment