महामंडळांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.
समता परिषदेची जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य व्यवसायिक, व्यापारी, शेतकरी यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने महाराष्ट्रातील सर्व शासकीय आर्थिक विकास महामंडळानी संपूर्ण कर्ज माफी करावी, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकार्यांमार्फत केली आहे.
मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंदे, व्यापार, छोटे-मोठे व्यवसाय बहुतांशी बंद होते. लॉकडाऊनमध्ये रोजंदारी व छोटे-मोठ्या व्यावसायिकांना लॉकडॉऊन कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी पोहोचली, तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकर्यांसह सर्व सामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, मौलाना आझाद विकास महामंडळ, संत सेना विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर मागासवर्गीय वित्त व महामंडळ आदिंकडून घेतलेले कर्ज कोरोना संकट काळात कर्ज फेडणे मुश्कील झाले आहे. राज्यातील इतर मागासवर्गासह इतर घटकातील नागरिकही उदरनिर्वाहाबरोबरच वेगवेगळ्या प्रश्नांनी त्रस्त असल्याकारणाने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे? कोरोनासह अतिवृष्टीच्या आसमानी संकटाला सर्वसामान्य नागरिक तोंड देत आहे. शासन स्तरावर कर्जमाफीची प्रक्रिया सुरु असेपर्यंत महाराष्ट्रातील विविध आर्थिक सहाय्यता महामंडळांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावले जात आहे. कर्जदाराच्या तारण जमिनी अधिग्रहण केल्या जात आहेत. सदर वसुली व अधिग्रहणाची कारवाई तात्काळ थांबवावी. तसेच ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्ज माफी देण्यात आली. त्याच धर्तीवर शासनाच्या विविध आर्थिक सहाय्यता विकास महामंडळांची सर्व कर्ज व्याजासह माफ करुन महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी मजूर, सुशिक्षित बेरोजगार, छोटे-मोठ व्यावसायिक यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढावे,असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी पश्चिम विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, शुभम धाडगे, संदिप राऊत, सतीश फुलसौंदर, मंगेश झिने, किशोर राऊत, अप्पासाहेब मेहेत्रे, दिपक गुलदगड, सचिन राऊत, सुमित वालकर, ओंकार भालके आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment