विश्वस्त म्हणून यशवंतराव गडाख, विभागीय कार्यवाहपदी जयंत येलुलकर
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड.
पुणे ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदीज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. विश्वस्त पदी ज्येष्ठ साहित्यिक श्री. यशवंतराव गडाख, विभागीय कार्यवाहपदी जयंत येलुलकर यांची निवड करण्यात आली .
म.सा.प.पुणे च्या काल रविवारी 18जुलै रोजी कार्याध्यक्ष श्री.मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणी सभेमधे हा निर्णय झाला. म.सा.प.च्या सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह असलेल्या येलुलकर यांनी जिल्हयातील साहित्य चळवळ वाढविण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले असुन यामुळें क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर येथे सावेडी शाखेने प्रतिष्ठेचे विभागीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष उद्योगपती श्री. नरेंद्र फिरोदिया स्वागताध्यक्ष असलेले हे संमेलन विवीध साहित्य कार्यक्रम, महाराष्ट्रातील असंख्य साहित्य रसिकांचा प्रतिसाद व सुयोग्य नियोजनामुळे साहित्य क्षेत्रात मानाचे पान ठरले आहे. दोन वर्षापूर्वी शाखेने हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने आयोजीत केलेले विद्यार्थी साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरले होते.
सावेडी शाखा गेल्या सहा वर्षापासून जिल्हयातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळण्यासाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या सहकार्याने वारसा दिवाळी अंकांचे प्रकाशन करते. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांचा सहभाग असलेल्या या अंकास सलग दोन वर्षे विख्यात साहित्य संस्थांकडून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. काव्यस्पर्धा, लेखन स्पर्धा, ज्येष्ठ व तरुण साहित्यिकांना शांतीकुमार फिरोदिया साहित्य पुरस्कार, मराठी भाषेची गोडी वाढण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना विवीध पुस्तकांची भेट अशा अनेक उपक्रमांमुळे सावेडी शाखेचा म सा. प पुणे यांनी खास गौरव केला होता. येलुलकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मॅनेजिंग कमिटीवर असताना आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले असून बी.सी.सी.आयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी येलुलकर यांना यासाठी खास सन्मानित केले आहे. येलुलकर यांच्या निवडीबद्दल यशवंतराव गडाख, आ.श्री.संग्राम जगताप, श्री.नरेंद्र फिरोदिया, चंद्रकांत पालवे यांनी अभिनंदन केले असुन जिल्ह्याच्या साहित्य वर्तुळातून त्यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment