धोका टळलेला नाही, महापालिका प्रशासन सतर्क राहणार : आयुक्त शंकर गोरे
ब्रेक दि चेन निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल आयुक्त व महापौर यांचा सन्मान
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ब्रेक दी चेन मोहीमेअंतर्गत शासन निर्देशानुसार नगर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले आहेत. मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसून प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासन सतर्क राहणार असून खबरदारीच्या उपाय योजना करणार असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ब्रेक दी चेन मोहीमेतील निर्देशांचे महापालिका प्रशासनाने शहरात प्रभावी अंमलबजाणी केलेल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आली, त्याबद्दल येथील स्व. रामलालजी ललवाणी मेमोरियल फौंडेशनच्यावतीने महानगरपालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कोविड योध्दा सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी श्री गोरे बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, निर्बंध शिथील झाले असले तरी नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे कटाक्षाने पालन करावे. रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे.
राज्य शासनाच्या ब्रेक दि चेन निर्देशांची शहरात प्रभावी अंमलबजावणी झाली. यासाठी महानगरपालिका प्रशासनातील सर्व घटकांनी परिश्रम घेतले, त्यामुळे सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतुन महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त शंकर गोरे व महापौर बाबासाहेब वाकळे यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे यावेळी स्व रामलालजी ललवाणी मेमोरियल फौंडेशनचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी यावेळी सांगीतले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगरकरांनी महापालिका प्रशासनास केलेल्या सहकार्यामुळे शहरात सध्यातरी कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे. मात्र आणखी काही दिवस नियमांचे संयमाने पालन करणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन यावेळी महापौर वाकळे यांनी केले. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब पवार, उद्योजक योगेश पवार, स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे, राजू लयचेट्टी, किशोर कानडे, गणेश भंडारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment