शिवसेनेच्या वतीने शहरात पाच हजार झाडे लावणार ः दिलीप सातपुते
माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष ः विक्रम राठोड.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. याची जाण ठेवून प्रत्येकाने फक्त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही प्रयत्न करणं आवश्यक आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष.आहे असे प्रतिपादन युवासेना जिल्हाअध्यक्ष विक्रम राठोड यांनी केले.
जागतिक पर्यावरणदिन निमित्त उपशहरप्रमुख गिरीष जाधव यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात वृक्षारोपण युवासेना जिल्हाअध्यक्ष विक्रम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, गिरीष जाधव, अभिषेक कळमकर,संजय शेंडगे, संतोष गेनआप्पा, निलेश भाकरे, दत्ता जाधव, शशिकांत देशमुख, अंबादास शिंदे, मंदार मुळे, संजय वल्लाकट्टी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले या कोरोनाच्या महामारीत आपल्याला ऑक्सिजनचा महत्व चांगलाच कळला आहे कारण ऑक्सिजनच्या तुतवडा झाला त्यामुळे अनेकांनी आपला जिव गमवला.बाहेरच्या देशातून ऑक्सिजन मागवण्याची वेळ आली.त्यामुळे प्रत्येकाने निसर्ग उत्तम ठेवण्यासाठी झाडे कायम लावली पाहिजे या वर्षीही नगरशहर शिवसेना पाच हजार झाडे लावणार. गिरीष जाधव म्हणाले ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग निसर्गप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणवाद त्यांनी समर्पकपणे सादर केला आहे. वृक्ष हे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेले, निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान, एक जीवनछत्र, एक आधार-मानवी जीवन व वृक्ष यांच्यात एक अतूट नाते आहे. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत, त्यांची एकसमयावच्छेदे पूर्ती करणारे हे निसर्ग देणे. अनादी कालापासून मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असलेले, मानवाच्या ऐहिक व आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणारे, सर्वाग उपयोगी पडणारे/ उपयुक्त असणारे, स्थितप्रज्ञ योग्यासारखे. वनचरे व पक्षी यांनाही अन्न, वस्त्र, निवारा देणारे जाती, धर्म, वंश, लिंग, शत्रू-मित्र, गरीब- श्रीमंत, रोगी-निरोगी, साक्षर-निरक्षर, काळा-गोरा, खुजा-उंच इ.इ. कसलाही भेदभाव न करता सर्वाना समभावनेने अंगाखांद्यावर खेळवणारे, वृक्ष हे केवळ मानवच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनदायी तत्त्व आहेत. याप्रसंगी अभिषेक कळमकर म्हणाले वृक्ष मानवी जीवनाचे तारक असल्याचे आपल्या पूर्वजांनी जाणले होते व त्यामुळे त्यांनी वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन इ. इ. सारखे कार्यक्रम सुरू केले व अनाठायी वृक्षतोड होऊ नये म्हणून ‘देवराया’ वगैरेसारखे उपक्रम धार्मिक श्रद्धांशी निगडित करून त्या उपक्रमांना एकप्रकारे सबल अधिष्ठान दिले. भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे वृक्षप्रेम अनादी कालापासून आहे, तसेच त्याचे संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. भारतीय सण, उत्सव आदींमधूनही वृक्षांना अधिष्ठान प्राप्त आहे. वृक्ष भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळवून आहेत.फार फार पुरातन काली वसुंधरेवर प्रचंड जंगले होती. घनदाट वृक्षरांजीने सर्व जग व्यापले होते, आणि कालांतराने भूपृष्ठावर भूकंपासारखे प्रचंड उत्पात होऊन ती महाकाय वृक्षरांजी जमिनीत खोलवर गाडली गेली.
No comments:
Post a Comment