नगर-कल्याण रस्त्यावरील सीना नदीपात्रातील पूल बनला अपघाताचे आगर.
नगर जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाचा बोजवारा...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर कल्याण रोड वरील सीना नदीपात्रात मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात झाले असून, यामध्ये गंभीर, किरकोळ अशा सर्वप्रकारच्या अपघातांचा समावेश आहे. तरीही दरवर्षी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमाने साजरा करण्यात येणारे ‘रस्ता सुरक्षा अभियान’ प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशाखापट्टणम् हायवेअंतर्गत नेप्ती नाक्यावरील सीना नदी पात्रावरील पुलावर मोठे खड्डे तयार झाले असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून या पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे असताना प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष झालेले असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी हवामान खात्याने पाऊस जास्त होण्याचा अंदाज दर्शविला असून पावसात वाहन चालवणे धोक्याचे असते. अशावेळी रस्ते सुरक्षित आणि दिशादर्शक, सूचना फलक रस्त्यावर लावणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, या उन्हाळ्यात ही काम करण्यात आले नसल्याचे दिसून आलं. नगर शहरातील रस्त्यांवर सुद्धा अनेक भागात गतिरोधक नसणे, नियमित रस्त्यांवर पाणी साचणे, तसंच रस्त्यांवर कोणताही सुचना फलक नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे रस्ता खचून जाणे किंवा नियमबाह्य गतिरोधक चालकाला दिसले नाही. तर, अपघात होण्याची शक्यता वाढत आहे.
खरंतर पावसाळा सुरु होण्यापूर्वी उन्हाळ्यामध्येच रस्त्यांशी संबंधित कामे पूर्ण करायची असतात. मात्र, त्या दिशेने कोणतंच काम झालेलं दिसत नाही. विशेष म्हणजे अलिकडेच रस्ता सुरक्षा अभियानदेखील पार पडले. परंतु,तरीदेखील रस्त्यांवरील अपघात टाळण्याच्या दृष्टीने कोणतेही काम न झाल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, राज्यभरातील रस्ता सुरक्षा अभियान अपयशी ठरल्याचं पाहायला मिळतं. रस्त्याने प्रवास करत असताना आपल्याला कायमच त्यावर पांढरे व पिवळ्या रंगाचे पट्टे असल्याचं दिसून येतं. रस्त्यांवरील धोके व सूचना देण्यासाठी हे पट्टे आखण्यात आले असतात. मात्र, ऐन पावसाळ्यात रस्त्यांवरील हे पट्टे पुसले गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे. राज्यातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय आणि महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या रस्त्यांवरील हे पट्टे मिटले आहेत. राज्यातील रस्ते ज्या ज्या विभागाच्या अंतर्गत येतात त्यांनी विविध धोके आणि सूचना दर्शवणारे पांढरे आणि पिवळे पट्टे मारायचे आहे. रस्ता सुरक्षाअंतर्गत सुद्धा जिल्हाधिकार्यांनी हे काम करून घ्यायचे असतात. जर हे काम झालं नसेल तर याला संबंधित विभाग जबाबदार आहे, असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेची काम करायची होती. यामध्ये अपघात स्थळांची माहिती घेऊन तेथे दुरुस्ती करणे, रस्त्याचे डिझाइनमध्ये बदल करणे, रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून घेणे, साईनबोर्ड व माहितीचे बोर्ड लावणे, दुभाजकाचे व गतिरोधकांची रंगरंगोटीचे काम करणे, नादुरूस्त सिग्नल्स, खराब झालेले बोर्ड दुरुस्ती करणे, महत्त्वाच्या जंक्शनवर पादचार्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखून घेणे, प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीचे ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. मात्र, यातील बहुतेक काम झालेच नसल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment