समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वापरता आले तर मराठवाड्याचा प्रश्न मिटेल ः तनपुरे
नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः नगर-नाशिक जिल्ह्यावर अन्याय करणारा समन्यायी पाणी वाटप कायदा आता होऊन गेला आहे, भूतकाळात काय झाले त्यापेक्षा आता समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वापरता आले तर मराठवाड्याचा प्रश्न मिटेल. जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांनी ही कामे जलदगतीने कशी होतील यासाठी प्राथमिकता दिली असल्याचे मत राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
एका खाजगी वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की मराठवाडा हा देखिल राज्याचा एक भाग आहे , गोदावरी खोरे हे तुटीचे खोरे आहे.नगर - नाशिक आणि मराठवाड्यात पाण्यावरून यापूर्वी वाद झालेले आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री ना जयंत पाटील यांनी समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्याकडे वळवण्यासाठी च्या योजनेला प्राथमिकता दिलेली आहे. वेळोवेळी त्यांच्या याबाबतचा आढावा सुरू असतो. ही कामे जलद गतीने कशी होतील यावरच त्यांचा प्रयत्न असल्याचे तनपुरे म्हणाले.
नगर जिल्ह्यातील पाण्यासाठी मीही यापूर्वी आंदोलनात सहभागी झालेले असल्याचे सांगत तनपुरे म्हणाले की, आता मी मंत्री आहे , पाण्याचे वाद , समन्यायी पाणी वाटप,या भूतकाळात झालेल्या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा अधिकचे पाणी तुटीच्या खोर्यात वापरता आले तर मराठवाडा नगर नाशिक वाद मिटून जाईल , असा मला विश्वास आहे .
यावेळी तनपुरे यांनी महावितरण ची कामे शेतीला दिवसा पाणीपुरवठा मतदार संघातील विविध कामे याबाबत माहिती दिली . सध्याच्या राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना त्यांनी सध्या विरोधक हे सत्तेसाठी राजकारण करत असल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे मात्र त्यांनी कौतुक केले. आपल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात गावागावात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गावातच जनता दरबार येऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर असतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment