गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवा बंद करा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 15, 2021

गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवा बंद करा!

 गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवा बंद करा!

निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. गेल्या वेळी आपण करोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात बर्‍यापैकी यश मिळवले होते. मात्र, आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकार्‍यांची बैठक मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे काल घेतली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, राज्य शासनाने दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
करोना विषाणूचे उत्परिवर्तन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संक्रमित झाली आहे. प्राणवायू उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ कृती दलाकडून समजून घ्यावे. प्राणवायूचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील. तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे. विवाह समारंभ हे करोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे असे ठाकरे यांनी सांगितले.
रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळावा हे सांगताना प्राणवायू सांभाळून व गरजेप्रमाणेच वापरावा अशी सूचना राज्याच्या कृती दलाचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, तात्याराव लहाने यांनी के ली. एचआरसीटी तपासण्या तसेच प्लाझ्मा वापर याबाबतीतही त्यांनी मार्गदर्शन केले. आपण कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्याची चांगली अंमलबजावणी होईल, हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा करोनाची संसर्ग साखळी तोडणे  हा आहे हे लक्षात ठेवावे. कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाकडे तातडीने मार्गदर्शन मागावे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment