आल्हनवाडी नळ पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी ः प्रा. चव्हाण
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथे झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून, भ्रष्टाचार करणार्यांवर कडक कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण व आल्हणवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने अहमदनगर येथील जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, वंचित चे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, आल्हणवाडी येथील माजी सरपंच मच्छीन्द्र गव्हाणे, आल्हणवाडी चे माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास कर्डीले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झांबरे आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडी व पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील ग्रामस्थांनी पाथर्डी येथील पंचायत समिती येथे या संदर्भात अनेकदा आंदोलने केली. सदर योजनेतील भ्रष्ट्राचाराची चौकशी उपअभियंता जि. प.ग्रा.पा.पु. उपविभाग पाथर्डी यांच्या मार्फत झाली आहे. चौकशीचा अहवाल दि. 3 फेब्रुवारी 2021 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे दिला आहे. संबंधित चौकशी अधिकार्याने राजकीय दबावापोटी वस्तुनिष्ठ व निःपक्षपातीपणे चौकशी केलेली नाही. नळ पाणी पुरवठा योजनेत केलेली चौकशी ही भ्रष्टाचार करणार्यांना पाठीशी घालणारी आहे.
सदरील चौकशी अहवाल आम्हाला मान्य नसून सुमारे 48 लाख रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना न करता या योजनेची सगळी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. तरी सदर योजनेची सक्षम अधिकार्यांमार्फत चौकशी करून भ्रष्ट्राचार करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू.
या निवेदनाच्या प्रत माहितीसाठी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत. याबाबत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पाथर्डी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शीतल खिंडे यांच्याशीही याबाबत चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment