अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना कोरोना लसीकरण बंधनकारक.
अहमदनगर : राज्य शासनाने बुधवारी रात्री आठपासून लागू केलेली संचारबंदी जिल्ह्यातही लागू झाली आहे. मंगळवारी राज्य शासनाने जारी केलेला लॉकडाऊनचा आदेश जसाच्या तसा अंमलात आणण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत उघडे राहणार असून या सेवेतील दुकानदारांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. काल सायंकाळी सर्व जिल्हाधिकार्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये सूचना मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक आदेश जारी केला. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केलेल्या घोषणा आणि राज्य शासनाने काढलेला आदेश जसाच्या तसाच नगर जिल्ह्यातही लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरू राहणार आहेत. 14 एप्रिलच्या रात्री आठपासून ते 1 मेच्या सकाळी सातपर्यंत विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील सुरू असलेल्या दुकानदारांना लसीकरण बंधनकारक असणार आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात जी दुकाने बंद आहेत, त्या दुकानदारांनी बंदच्या काळात लसीकरण करून घ्यायचे आहे. नियमांचे पालन करीत नसलेल्या ग्राहकाला दुकानदाराने सेवा दिल्यास ग्राहकाला पाचशे रुपये आणि दुकानदाराला एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment