नियम मोडले तर, लाठी चा वापर!
राज्याच्या पोलीस महासंचालकांचा इशारा...
मुंबई - मास्क वापरा, हात सॅनिटाईझ करा. शक्यतो अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आपण आपली स्वतःची काळजी घ्या. कलम 144 लागू झाले असून 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत नाहीत.मात्र, नियम मोडले तर लाठीचा वापर केला जाईल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी विनाकारण फिरणार्यांना दिला आहे.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. असे सांगून पांडे पुढे म्हणाले की, कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. पण जाणून बुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असेही ते म्हणाले.
अत्यावश्यक कामास निघणार्या नागरिकांना दिलासा : सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असेल तर बळाचा, लाठीचा वापर होईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच अत्यावश्यक वाहतुकीस पासची गरज नसल्याचे सांगत पांडे यांनी अत्यावश्यक कामास निघणार्या नागरिकांना दिलासा दिला आहे.
विनाकारण फटकवू नका : राज्यात 144 कलम लागू होत आहे. त्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर विनाकारण फटकवू नका. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असं पांडे म्हणाले.
लोकांच्या सहकार्याची गरज लागणार : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात पोलीस दलावर सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत.यात आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज लागणार आहे.
नाहक कुणाला त्रास होणार नाही : नियम व अटी लोकांना आता माहीत झाले आहेत. त्यामुळेच त्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा असून पोलिसांकडून नाहक कुणाला त्रास होणार नाही, याची हमी मी देतो, असेही पांडे म्हणाले.
81 टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण : जगभर पसरलेल्या कोरोना महामारीशी आपल्याला लढा द्यायचा आहे. हा लढा आपण तुमच्या सहकार्याने यशस्वी करूया. पोलीस देखील यासाठी सज्ज आहेत. राज्यातील एकूण 81 टक्के पोलिसांचे दोन्ही टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे.
No comments:
Post a Comment