काल 57 जणांवर अत्यंसंस्कार
कोरोनाचा कहर चालूच...; रेमडेसीवीरची चढत्या भावाने विक्री.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसाला सरासरी 30 पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील चितांची आग चोवीस तास धगधगत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रूग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. रूग्णांना बेडपासून ते ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसीवीर मिळवण्यासाठी झगडावे लागत आहेत. दररोज सरासरी तीसपेक्षा जास्त रूग्ण दगावत आहेत. काल एकाच दिवशी 57 रूग्ण दगावल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातेवाईकांना वाट पाहावी लागली. 57 मृतांपैकी 20 जणांवर अमरधाम येथील विद्युत दाहिणीत तर 37 जणांवर सरण रचून अंत्यविधी करण्यात आले. आरोग्य यंत्रणेच्या माहितीत शुक्रवारी चाळीस मृत्यू झाल्याची आकडेवारी प्रसारित करण्यात आली होती. खाजगी कोविड रुग्णालये वेळेत मृत्यूंची माहिती शासकीय पोर्टलवर भरत नसल्याने ही तफावत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहे.
ऑक्सिजन प्रमाणेच रेमडेसीवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय, खासगी रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे अनेक खासगी मेडिकल चालकांनी रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरू केला आहे. याबाबत श्रीरामपूर, अहमदनगर येथे अन्न-औषध विभागाने डमी ग्राहक पाठवून महागात इंजेक्शन विकणार्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात एक नर्स रेमडेसीवीर इंजेक्शन चढ्या दराने विकताना रंगेहात पकडली आहे. पोलीस, अन्न-औषध विभाग छापेमारी करत असले तरीही अनेक ठिकाणी वीस ते पंचवीस हजार रुपयांना हे इंजेक्शन विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा काळाबाजार थांबवला जावा, अशी मागणी होत आहे.
शासकीय रुग्णालयातील कोरोना मृत्यूची आकडेवारी त्याच दिवशी पोर्टलवर अपलोड असते. त्याप्रमाणे ती प्रसारित होते. मात्र अनेक खासगी कोविड रुग्णालये त्याच दिवशी कोरोना मृत्यूची माहिती शासकीय संबंधित पोर्टलवर अपलोड करत नसल्याने ही तफावत येते. त्यामुळे कधी जास्त मृत्यू असताना कमी संख्या दिसते तर उशिराने अपलोड केल्यामुळे एखाद्या दिवशी कमी मृत्यू असताना आकडेवारी जास्त दिसत आहे.
- डॉ. अनिल पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक
No comments:
Post a Comment