नगर क्लबच्या मैदानावर फ्लड लाईटमध्ये क्रिकेटचा थरार सुरु
पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पीपीएल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील पंजाबी समाज एकवटला गेला. तर मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटात घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून गरजूंना दोन वेळचे जेवण पुरवून लाखो कुटुंबीयांना पंजाबी समाजाने मोठा आधार दिला. ही भावना व कार्य या खेळाच्या मैदानातून निर्माण झाले होते. जीवनात खेळाडूवृत्ती महत्त्वाची आहे. राजकारण, समाजकारण, व्यवसाय, उद्योग क्षेत्रात खेळाडू वृत्तीने सामोरे जाणारा व्यक्ती आपले कर्तृत्व सिध्द करीत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
पंजाबी समाज व पंजाबी ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. यावेळी प्रदिप पंजाबी, काकाशेठ नय्यर, आगेश धुप्पड, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, अनिश आहुजा, मोहित पंजाबी, सावन छाबरा, हर्ष बत्रा, सागर पंजाबी, डॉ.अभिषेक वाही, सनी आहुजा, कैलाश नवलानी, कमल कोहली, विजय बक्षी, अमरिश सहानी, विशाल बक्षी, राजेश सबलोक आदींसह खेळाडू व समाजबांधव उपस्थित होते.
आमदार जगताप पुढे म्हणाले की, स्पर्धामय धावपळीच्या जीवनात नागरिक मैदानापासून दुरावत असून, निरोगी आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी सर्व पंजाबी भाषिक व व्यावसायिकांनी घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. खेळाचा आनंद घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मैदानावर येणारा प्रत्येक जण हा खेळाडूच असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी समाजाला जोडण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 14 वर्षापासून साठ वर्षा पर्यंन्त ज्येष्ठ नागरिकांना संधी देण्यात आली आहे. तसेच यावर्षी महिलांचे संघ देखील या स्पर्धेत उतरले आहेत. तीन दिवस चालणार्या या क्रिकेट स्पर्धेचे नियम मनोरंजनात्मक असून, सर्वांना या क्रेझी क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत हितेश ओबेरॉय यांनी केले. पंजाबी प्रीमीयर लीगचे हे तीसरे वर्ष असून, या स्पर्धेत 10 संघांचा समावेश आहे. दिवसा तसेच रात्री फ्लड लाईटमध्ये या स्पर्धा होणार आहे. नाणेफेक हरणारा फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. एक षटक 5 चेंडूचा असून, प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकणे बंधनकारक आहे. 15 धावा करणारा फलंदाज रिटायर होतो. अशा अनेक मनोरंजनात्म नियमांचा समावेश या क्रेझी क्रिकेटमध्ये आहे. तर यावेळी महिलांच्या संघांना देखील प्रवेश देण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मकतेचे सर्व नियम पाळून क्रिकेटचे सामने होत आहे. विजेत्या संघास व उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्र ओबेरॉय यांनी केले. आभार सावन छाब्रा यांनी मानले.
No comments:
Post a Comment