आनंदऋषी महाराजांचे मानवसेवेचे व्रत ’सुरभी’ने जोपासले : आ. जगताप
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आनंदऋषीजी महाराज साहेब यांनी मानवसेवेचे व्रत अंगिकारून समाजाची सेवा केली. त्यामुळे देशभरात त्यांचा मोठा भाविक वर्ग निर्माण झाला आहे. आनंदऋषी महाराजांनी ज्या पद्धतीने मानवसेवा केली होती, तेच व्रत सुरभी हॉस्पिटलने जोपासले आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
सुरभि हॉस्पिटलमध्ये राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वरोग निदान व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अस्थिरोग व मणके विकार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ. जगताप बोलत होते. यावेळी नगरसेवक सागर बोरुडे, आरिफ शेख, सुरभी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी, डॉ. विलास व्यवहारे, डॉ. तुषार मुळे, डॉ. अमित पवार, डॉ. गणेश जंगले, डॉ. विनायक शिंदे, डॉ. प्रितेश कटारिया, जहागीरदार यांच्यासह सर्व डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले की, राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाची सेवा केली. त्यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक सेवेसाठी खर्च केले. त्यामुळे आनंदऋषीजी महाराज साहेब यांचा एक मोठा भक्तवर्ग देशभरातील विविध ठिकाणी विस्तारलेला आहे. मानवसेवा हीच त्यांची ओळख होती. त्याच पद्धतीने सुरभी हॉस्पिटलने मानवसेवेचे व्रत हाती घेऊन रुग्णसेवा सुरू केली आहे. आज नगर शहरासह परिसरात अनेक हॉस्पिटलची उभारणी होत असताना सर्वरोग निदान शिबिराच्या माध्यमातून सुरभी हॉस्पिटलने सर्व घटकातील रुग्णांची मोफत तपासणी करून कमी दरात उपचाराची सोय केली आहे. याचा जिल्ह्यातील हजारो रुग्ण फायदा घेत आहे. यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
No comments:
Post a Comment