माध्यमिक शिक्षक सोसायटी ऑनलाईन सभेमुळे गोंधळ टळला
सेवानिवृत्त सभासदांना संस्थेचे सभासदत्व देण्यास विरोध
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः माध्यमिक शिक्षक संस्थेच्या ऑनलाईन सभेत सेवानिवृत्त सभासदांना संस्थेचे अ वर्ग सभासदत्व देण्यास सभासदांनी विरोध दर्शविला असून संस्थेनेही असा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.मयत सभासद निधीत चार लाखावरून पाच लाख करणे,40 टक्के अनुदावावरील सभासदांना संस्थेचे सभासद करून घेणे आणि कर्जावरील व्याजदर अर्धा टक्के कमी करणे असे विषय आजच्या सभेत मंजूर करण्यात आले.
माध्यमिक शिक्षक संस्थेची 77 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज अध्यक्ष चांगदेव खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी जेष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, व्हाईस चेअरमन जनार्धन काळे , सूर्यकांत डावखर, सुरेश मिसाळ, दिलीप काटे, काकासाहेब घुले, अशोक ठुबे, संजय कोळसे सत्यवान थोरे, अनिल गायकर कैलास रहाणे, मनीषा मस्के, अशा कराळे,अप्पासाहेब शिंदे,धनजय म्हस्के,महेंद्र हिंगे,बाबासाहेब बोडखे तसेच इतर संचालक यावेळी उपस्थित होते.ऑनलाईन सभेमुळे ऑफलाईन प्रमाणे होणारा गोंधळ,घोषणाबाजी यावेळी झाली नाही.यावेळी सभासदांनी सेवानिवृत्त सभासद व ठेवीदारांना संस्थेचे अ वर्ग सभासद करून घेण्यास विरोध केला.तसेच सभासदांनी आपले प्रश्न ऑनलाईन विचारून सभेत भाग घेतला.
यावेळी सभासदाच्या प्रश्नांना उत्तरे देताना कचरे म्हणाले कि,जून 2020 ऐवजी आपली सभा मार्च 2021 मध्ये होत आहे.सेवा निवृत्त सभासदांना संस्थेचे मूळ सभासद करण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले.तसेच संस्थेने कर्जमर्यादा 14 लाख करूनही कर्ज घेण्याचे प्रमाण कमी असल्याने यापुढे जामीन कर्जावरील व्याजदर साडे आठ टक्क्यावरून आठ टक्के करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.त्याची अंमलबजावणी लगेच सुरु होणार असल्याचे कचरे यांनी जाहीर केले.ज्या शिक्षकांना व इतर कर्मचारी यांना शासनाचे 40 टक्के अनुदान मंजूर झाले आहे त्यांना संस्थेचे सभासद करून घेण्यात येणार आहे.मयत निधीची वर्गणी 150 रुपयावरून 200 रुपये करण्यात येणार आहे . तसेच सभासदांच्या कायम ठेवीवरील व्याज मे महिन्यातच त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे .
प्राताविक अध्यक्ष चांगदेव खेमनार यानी केले .यावेळी विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे व बाबासाहेब बोडखे यांनी सर्वसाधारण सभेत होणारे काही विषय इतिवृत्तात येत नसल्याची नाराजी व्यक्त केली तसेच संस्थेचे ऑनलाईन कामकाज अजून पूर्ण का होत नसल्याचा जाब विचारला.यावेळी सुनील दानवे,संतोष ठाणगे,किरण धाडगे,मंगेश काळे,राहुल बोरुडे,दादा साळुंके,विजय साळवे आदींनी सभेत सक्रीय सहभाग घेतला.सचिव स्वप्नील इथापे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले.यावेळी सर्व विषय मंजूर करण्यात आले.
No comments:
Post a Comment