घरकुलाच्या कामासाठी कर्जत पंचायत समितीने कंबर कसली
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत तालुक्यातील घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीने कंबर कसली असून यासाठी प्रत्येक गावाची स्वतंत्र जबाबदारी देऊन त्याचे रिपोर्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मार्च अखेरीस तालुक्यात सर्वसामन्याच्या घरकुलाचा प्रश्न बर्यापैकी मार्गी लागेल असा विश्वास आहे.
शासनाने घरकुलाच्या प्रश्नांकडे महाराष्ट्रात विशेष लक्ष घातले असून यासाठी महा आवास अभियाना अंतर्गत 28 फेब्रु पर्यत सर्व घरकुले मंजूर करून पाहिला हप्ता द्यायचा होता शासनाने ही तारीख 31 मार्च केली. जिल्ह्यात घरकुलाच्या प्रश्नात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी विशेष लक्ष घातले. याबाबत कर्जत मध्ये येऊन पंचायत समिती मध्ये ग्रामसेवकांची बैठक घेत गाव निहाय आढावा घेतला. याशिवाय भांबोरा व सिद्धटेक येथे स्वतः जाऊन घरकुलाची पाहणी ही केली.
कर्जत तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे टार्गेट 3709 असून यापैकी 3706 घरकुलाच्या प्रस्तावाना मंजुरी मिळाली आहे. या वर्षात प्रधान मंत्री आवास योजने तुन 1351 घरकुले मंजूर झाली असून 1337 घरकुला साठी पहिला हप्ता ही दिला गेला आहे. जिल्ह्यात मंजुरी बाबत कर्जत पंचायत समितीचा पहिला क्रमांक लागतो तर मंजूर घरकुले पूर्ण करण्यात जिल्हयात पाचवा क्रमांक लागतो.
रमाई आवास योजने अंतर्गत 600 घरकुलाचे प्रस्ताव दाखल असून या पैकी 597 मंजूर झाले आहेत या पैकी 566 घरकुलाना पहिला हप्ता देण्यात आला आहे यामध्ये ही कर्जत पंचायत समितीचा जिल्हयात प्रथम क्रमांक आहे. शबरी आवास योजने अंतर्गत 25 घरकुलाना मंजुरी मिळालेली असून यातील 24 घरकुला ना पहिला हप्ता देण्यात आला आहे अशी माहिती गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. इंदीरा आवास योजने तील 2014 च्या अगोदरच 63 घरकुलाचे पैसे मिळने प्रलंबित असून शासन स्तरावर पाठपुरावा केला जात आहे.
मार्च अखेरीस तालुक्यातील घरकुलाची कामे सुरू होऊन पहिला हप्ता तरी जाईल यासाठी काम करावयाचे आहे यासाठी कर्जत पंचायत समितीने विशेष कृती आराखडाच बनविला असून गट विकास अधिकारी अमोल जाधव हे स्वतः थेट गावागावात जाऊन घरकुलाना भेटी देऊन अडचणी समजावून घेत आहेत. याशिवाय पंचायत समितीच्या सर्व विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, केंद्र प्रमुख याचे कडे प्रत्येकी दोन वा तीन गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. लाभार्थ्याच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणेचे काम केले जात आहेत. याशिवाय आपल्या गावाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामसेवक विशेष मेहनत घेत आहेत. यासाठी सम्पर्क अधिकारी सकाळीच गावात पोहचत असून उशिरा पर्यत गावात सम्पर्क साधून लोकांशी बोलत आहेत.
घरकुलाचे काम करताना गाव पातळीवर ही अनेक अडचणी येतात येत आहेत यामध्ये गवंडी वा मजूर मिळत नाहीत, काही लोक कामानिमित्त बाहेर गावी स्थलांतरित आहेत, याशिवाय जागेच्या अडचणी, बांधकाम साहित्य घेण्यासाठी पैसे नाहीत, ज्याचे नावावर घरकुल आहेत त्यातील काही लोक जेष्ठ नागरिक आहेत त्याचे नाव काम करण्यास इतर कोणी नाहीत, अशा अडचणीत संबंधित अधिकारी, ग्रामसेवक विशेष पुढाकार घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
31 मार्च पर्यत घरकुल पूर्ण करणार्या नागरिकांना शासन स्तरावरून ही सन्मानित करण्यात येणार असून तालुका स्तरावर, क्षेत्रीय स्तरावर, अथवा गाव पातळीवर घरकुल मंजुरी व हप्ता मिळन्यासाठी कोणाला ही कसल्या प्रकारची रक्कम द्यावी लागत नाही त्यामुळे घरकुल या विषयासाठी कोणीही पैसे देऊ नयेत असे आवाहन सभापती अश्विनी कानगुडे व गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.
सध्या लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात शासन स्तरावर अनेक घडामोडी होत असताना सध्या घरकुल योजने कडे विशेष लक्ष दिले जात असून मार्च नंतर निधीबाबत अडचणी वाढू शकतात त्यामुळे नागरिकांनी तातडीने आपली घरकुले पूर्ण करने आवश्यक आहे. व यासाठी शासन आपल्या दारी येत असताना याचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले घरकुल लवकरात लवकर लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment