पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटना करणार रास्ता रोको
कृषी कायद्याविरोधात; उद्या टाकळी ढोकेश्वर-वासुंदे चौकात आंदोलननगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्ली येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात संयुक्त किसान एकता मोर्चाने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटना दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 10 वाजता रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.
यासंबंधीचे निवेदन भुमिपुत्र शेतकरी संघटना, राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये केंद्रातील भाजपा सरकारने जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकर्यांच्या विरोधात आणलेले नवीन तीन काळे कायदे ताबडतोब रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 70 दिवसांपासून संपूर्ण देशातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करीत आहेत. परंतु गेंड्याच्या कातडीच्या भाजपा सरकारवर अद्याप कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. उलट सरकार शेतकर्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी व शेतकर्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा व बळाचा गैरवापर करून शेतकर्यांवर दडपशाही व अत्याचार करीत आहेत. या विरोधात आम्ही टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात रस्ता रोको आंदोलन करत आहे. असे निवेदन पारनेर तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अविनाश देशमुख, संतोष कोरडे, सिताराम देठे, सुभाष गायकवाड, संतोष खाडे, रवींद्र साळवे, पोपट दरेकर, शुभम टेकुडे, तेजस भोर, सचिन भोर, सतीश वाडेकर, दीपक गुंजाळ, संतोष केदारी, महेश झावरे, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment