धार्मिक स्थळे ही आपली बलस्थाने ः आ. जगताप
तपोवन रोडवरील एसटी कॉलनीत गणेश मंदिराचा वर्धापन दिननगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः माणसाला मन:शांती ही फक्त अध्यात्मिक ज्ञानाने मिळते, पण त्याचबरोबर मठ, मंदिरे उभारुन चालणार नाही तर त्यांचे पावित्र्य राहिले पहिजे. नगर जिल्हा ही संतांची भुमी असलेला आहे. धार्मिक स्थळे ही आपली बलस्थाने आहेत, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. तपावेनरोड वरील एस.टी. कॉलनीतील गणेश मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंदिराला आ.जगताप यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, योगेश पिंपळे व भाविक उपस्थित होते. आ. जगताप पुढे म्हणाले कॉलनीतील मंदिरामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होते. सुख, शांती समाधानाचे ते प्रतिक आहे. मंदिरामुळे सर्वजण एकत्र येतात, यामुळे एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते. एस.टी. कॉलनीमधील या मंदिरासाठी नगरसेवक त्र्यंबके यांनी सुरवातीपासून मोठे योगदान दिले. साई बाबांच्या मंदिरामुळे धार्मिक कार्यात त्यांचे नाव होत आहे. गणेश मंदिराच्या वर्धापन दिनासाठी त्यांचे सहकार्य असल्याने आज मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले, असे ते म्हणाले.
गणेश मंदिरासाठी नित्यनियमाने स्थानिक नागरिक आरतीसाठी एकत्र येतात. विधिवत पूजा-अर्चा होत असल्याने र्श्रीं ची कृपा आहे, असे मत नगरसेवक त्र्यंबके यांनी व्यक्त केले.
मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्री.गणेश मूर्तीस अभिषेक, भजन, प्रवचन व महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. यावेळी भाविकांनी सर्व धार्मिक कार्यास उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.
No comments:
Post a Comment