एक नव्हे तर दोन्ही घरांचे जीवन उजळून टाकणारी बालिकाच असते - डॉ. सुधा कांकरिया
नगरी दवंडी
अहमदनगर - एक नव्हे तर दोन्ही घरांचे जीवन उजळून टाकणारी बालिकाच असते. सासरी व माहेरी दोन्ही कडे ती आपल्या सद्गुणांनी, कर्तृत्वानी उजेडाची मानकरी ठरते. असे प्रतिपादन राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल, येथे आयोजित कार्यक्रमात स्त्रीजन्माचे स्वागत करा या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेच व्हाईस चेअरमन श्री दशरथ खोसे होते. व्यासपीठावर सेक्र्रेटरी श्री झालानी, विश्वस्त सौ येवलेकर, मुख्याध्यापिका सौ गावडे उपस्थित होत्या.
डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की, आज स्त्रीभ्रुणहत्येमुळे समाजाची घडी विस्कटली आहे. ती परत नीट बसविण्यासाठी स्त्रीजन्माचे स्वागत झाले पाहिजे. आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विद्यालयात स्त्रीजन्माच्या स्वागताचा ठराव घेण्यात आला, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी हात उंच करून ठरावाला मान्यता दिली. तसेच फक्त कन्या असलेल्या परिवारांचाही सन्मान करण्यात आला. ही अभिनंदनीय बाब आहे. ज्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्म होत नाही त्या कुटुंबातील आईला दोषी ठरवले जाते. तिच्यावर अन्याय, अत्याचार केला जातो ही बाब थांबविण्यासाठी गुणसुत्राचे विज्ञान प्रत्येक घरात समजावून सांगितले पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. दोघांचेही स्वागत करण्याची भूमिका असावी असे त्या म्हणाल्या.
संस्थेचे चेअरमन श्री. खोसे म्हणाले की मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे. मुली कुठेही कमी नाहीत. उलट अधिक चिकाटीने, प्रामणिकपणे त्या कार्यरत असतात. या प्रसंगी त्यांनी काही उदाहरणे सांगितली. डॉ. सुधा कांकरिया यांनी स्त्रीजन्माचे स्वागत करा ही चळवळ ३५ वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा सुरू केली. त्यासाठी ११ कलमी कृती कार्यक्रम तयार करून देशभर पोहचवला. यासाठी ३ तप सुधाताईंनी कार्य केले. आजही करत आहेत. स्त्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीच्या त्या आद्यप्रवर्तक आहेत. त्या स्वत: आज आमच्या विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून आल्या याचा आम्हाला खूप आनंद होत आहे असे मुख्याध्यापिका सौ गावडे यांनी सांगितले. डॉ. सुधा कांकरिया यांनी उपस्थितांना स्त्रीजन्माच्या स्वागताची शपथ दिली.
No comments:
Post a Comment