ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने अभिवादन
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली - अभय आगरकरनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 साली पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठीही शाळा सुरु केली. त्यांच्या या कार्याला सतत विरोध होत असे. पण महात्मा फुले आपल्या भूमिकेवर ठाम होते. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. अशा महान व्यक्तीमत्वाचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीविशाल देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराच्यावतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, नगरसेवक दत्ता कावरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी अशोकराव कानडे म्हणाले, महात्मा फुले यांनी आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी अर्पण केले. समाजातील दिनदुबळ्या, पिचलेल्या अशिक्षित समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. त्यामुळेच समाज जागृत होऊन शिक्षणाची क्रांती झाली. समाजातील परिवर्तनाची मोठी क्रांती त्यांनी केले. त्यांचे विचार आजही आपणास प्रेरणादायी आहेत, असे सांगितले.
No comments:
Post a Comment