लायन्स क्लब, मराठी पत्रकार परिषद व पोलीस दलच्यावतीने 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 27, 2020

लायन्स क्लब, मराठी पत्रकार परिषद व पोलीस दलच्यावतीने 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

लायन्स क्लब, मराठी पत्रकार परिषद व पोलीस दलच्यावतीने 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलिसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद व पोलीस दलच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. भारत माता की जय..., वंदे मातरम...च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. तर संविधान दिनानिमित्त उपस्थितांना नागरी कर्तव्ये पार पाडण्याची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर, तोफखाना पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. किरण सुरसे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, लायन्सचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे, लायन्सचे रिजन चेअरमन हरजितसिंह वधवा, सुधीर लांडगे, कमलेश भंडारी, एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अरविंद पारगावकर,  युवान संस्थेचे संदीप कुसळकर, डॉ. मिरा बडवे, कमलेश भंडारी उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी प्राणाची आहुती देणार्या जवान व पोलीसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आल्याचे स्पष्ट केले. संविधानाने बहाल केलेली नागरी कर्तव्ये नागरिकांनी पार पाडल्यास शत्रू व दहशतवाद्यांना हल्ले करता येणार नसल्याचे स्पष्ट करुन, उपस्थितांना नागरी कर्तव्य पार पाडण्याची व देश रक्षणासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली.
अरविंद पारगावकर यांनी यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन केले. संदीप कुसळकर यांनी 26-11 ला पोलीस व लष्करातील जवानांनी अतिरेकी हल्ला परतवून लावला. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून, नागरिकांनी नियमांचे पालन करुन हे संकट परतवून लावण्याचे आवाहन केले. मन्सूर शेख यांनी जीवाची पर्वा न करता देश रक्षणासाठी भारतीय जवान व पोलीस योगदान देत असतात. 26-11 च्या हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नसून, ते प्रत्येक नागरिकांच्या मना-मनात जिवंत असल्याची भावना व्यक्त केली.
मानगावकर म्हणाले की, शत्रू राष्ट्र दहशतवादी कारवाया करुन राष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. जीवाची पर्वा न करता बाहेरील शत्रूला रोखण्यासाठी भारतीय जवान तर अंतर्गत सुरक्षिततेसाठी पोलीस कर्तव्य पार पाडत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment