श्रमदानातून स्वच्छतेचे अर्धशतक पूर्ण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

श्रमदानातून स्वच्छतेचे अर्धशतक पूर्ण

 श्रमदानातून स्वच्छतेचे अर्धशतक पूर्ण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत शहरात विविध सामाजिक संघटनानी श्रमदानातून स्वच्छता हा मंत्र अंगीकारत गेली सलग पन्नास दिवस स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 च्या यज्ञात कचर्‍याची मोठी आहुती टाकली असून श्रमदानातून स्वच्छतेचे अर्धशतक आज दि 20 नोव्हे रोजी पूर्ण केले आहे.
कर्जत शहरात विविध सामाजिक संघटनानी एकत्र येत स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 मध्ये कर्जत शहराला स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला असून यासाठी दररोज सकाळी साडे सहा ते साडे सात या वेळेत एकतास अगोदरच ठरवलेल्या ठिकाणी जमा होतात व गाडीतून विविध प्रकारची हत्यारे काढून जे काम सुरू होते ते अत्यंत हसत खेळत चेष्टा मस्करी चर्चा यासह तासाभरात मोठे काम उभारले जाते, शहरातील मान्यवर मंडळी या अभियानात कचरा ओढताना पाहून त्या त्या ठिकानची स्थानिक रहिवाशी मंडळी अचंबित होतात, काही  तेवढ्या भागा पुरती सहभागी झालेल्या व्यक्ती बघतच राहतात, काही लोक घरातूनच अवलोकन करत असतात, काही लाजतात काही बुजतात मात्र काही लोक इतके निर्लज्य असतात की हा कचरा राहीला तो राहिला असे सांगून कंबरेवर हाथ देऊन मार्गदर्शन ही करतात, सर्व प्रकारची लोक भेटत असताना नियमित श्रणदानात सहभागी होणारे कोठेही रागवत नाहीत, नाराज होत नाहीत, थकत नाहीत की कोठे आपला संताप ही व्यक्त करत नाहीत अशा आनंददायी प्रवासात आपण ही सहभागी व्हा असे प्रत्येक जण अत्यंत प्रेमाने दुसर्‍या लोकांना सांगत काम संपवले जाते.
या स्वच्छता अभियानात स्वच्छता करताना अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची कामे अत्यंत तन्मयतेने करत आहेत, या अभियानासाठी आदल्या दिवशी टीमने कोठे काम करायचे हे  विविध भागात फिरुन पाहीले जातेे, जागा नक्की करत मेसेज तयार केला जातो,  तो विविध ग्रुप वर टाकला जातो, दरम्यान सगळे जण सकाळी आपल्या सायकली दुचाकी चारचाकी घेऊन सहभागी होतात, त्याबरोबर इको गाडी जी स्वच्छता अभियानामध्ये अत्यंत महत्वाचे काम करत आहे त्यामध्ये पाठी मागे फावडे, टिकाव, विळे, दाताळे, पंजे, खराटे, प्लास्टिक पिशव्या, कापडी भोत, बोर्ड आदी साहित्य घेऊन येते, येताच गाडीवरील स्पीकरवर सुंदर स्वच्छतेची गाणी लावली जातात, एक एक व्यक्ती आपल्याला लागणारे हत्यार घेऊन सकाळी काम सुरू होताच जिओ टॅगचे फोटो काढण्यात येतात,
तर कोणी व्हिडीओ काढतात, हास्य विनोदाने वातावरण हलके फुलके होऊ लागते, कोठे कोयते, कुर्हाडी चालायला सुरुवात होते, तर कोठे तलवारी सारख्या हत्याराने गवत कापले जात असते काही लोक दाताळा ने कचरा बाहेर काढतात तर काही हातात पुशवी घेऊन प्लास्टिक  सह बारीक कचरा गोळा करण्यावर भर देतात,
बघता बघता तास कधी संपतो हे समजत ही नाही, स्थानिक लोक असतील तर त्याच्याशी संवाद साधला जातो, जोरदार घोषणाबाजी केली जाते एकत्रित ग्रुप फोटो घेतला जातो व श्रमदानाचा कार्यक्रम संपन्न होतो त्या भागातील कोणी नाष्टा, चहा बिस्कीट आदींची सोय केली असेल तर त्याचा आस्वाद घेतला जातो व पावणे आठ ते आठ च्या दरम्यान सर्व जण अत्यंत आनंदी मनाने उत्साहात घराकडे परततात.
स्वच्छता अभियानात या टीम ने जमा केलेला कचरा नगर पंचायतचे कर्मचारी अत्यंत तातडीने भरून घेऊन जातात, यामाध्यमातून नगर पंचायत चे मोलाचे सहकार्य मिळत असून  यामध्ये सफाई कर्मचार्‍याचे काम यामध्ये अत्यंत महत्वाचे असून या सर्वांना सर म्हणून संबोधन्याचा पायंडा या स्वच्छता टीम ने पाडला असून त्यांना आदराने हे सर्व जण सन्मान देत आहेत
कर्जत शहरात 2 ऑक्टो रोजी सुरू झालेल्या या अभियानाने सलग पन्नास दिवस पूर्ण केले असून यादरम्यान दसरा, दिवाळी, पाडवा भाऊबीज या सणाला सुद्धा खाडे न करता हे अभियान अविरत राबविले असून कर्जत शहरात सुरू असलेल्या या उत्कृष्ट कामापासून प्रेरणा घेऊन शेजारील बहिरोबावाडी, कोळवडी या गावात जाऊन ही या टीम ने स्वच्छता केली असून त्या त्या गावात रविवारी श्रमदान करून स्वच्छता करण्याचा संकल्प स्थानिकांनी सोडला आहे तर कर्जत शहरातील ही शहाजीनगर, शिक्षक कॉलनी, सद्गुरूनगर, यासीननगर, माळेगल्ली, प्रभातनगर आदी सह विविध भागांतील महिला व नागरिकानी एकत्र येऊन रविवारी श्रमदान करण्याचा संकल्प केला आहे,  सदर टीमने सार्वजनिक ठिकाणाबरोबर विविध शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबविली असून त्यामध्ये त्या त्या कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी या अभियानात सहभागी झाले असून त्यातील काही कार्यालयांनी नंतर ही स्वच्छता करून घेतली आहे, तर शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, लोक प्रतिनिधीनी, नगरसेवक, नागरसेविकांंनी या अभियानात वेळोवेळी सहभागी होऊन श्रमदान केले आहे.
कर्जत शहरात स्वच्छता अभियान अत्यंत उत्साहाने राबविले जात असून विविध भागातील नागरिक सहभागी होत आहेत,  विविध सामाजिक संघटनांनी, तरुण मंडळांनी एकत्र येऊन या अभियानात सक्रिय होणे गरजेचे आहे, घराघरात स्वच्छतेबाबत जनजागृती होणे व त्यावर काम होणे आवश्यक आहे, या सर्व कामात नावीन्यता आणण्याची,  क्रिएटिव्हिटी आणण्याची गरज असून त्या साठी शहरातील युवकांनी, शिक्षकांनी महिलांनी मुलांनी या कामात आपले योगदान दिले  तरच आपले कर्जत शहर स्वच्छ व सुंदर होईल.

No comments:

Post a Comment