आ. पवारांच्या कार्यालयासमोर आंदोलन तसेच तहसिलसमोर पाल ठोको आंदोलन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील 20 कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत तीन वर्षांपूर्वी मंजुरी आणि दोन वर्षापूर्वी निधी आला तरी काम झाले नाही त्यामुळे मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यामुळे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आ. रोहीत पवार यांच्या कार्यालयासमोर मदारी समाजाने गारुड्याचा खेळ करून आंदोलन केले यानंतर तहसील कार्यालयासमोर पाल ठोकून धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाज करत आहे.
आ. पवारांच्या कार्यालयासमोर सकाळी साडेअकराच्या सुमारास वंचीत बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक डॉ अरूण जाधव, बापूसाहेब ओहोळ, विशाल पवार, द्वारका पवार, योगेश सदाफुले, अतिष पारवे, संतोष चव्हाण, हुसेन मदारी, फकीर मदारी, सरदार मदारी व सलीम मदारी कुटुंबासह आला होता. यावेळी मदारी समाजातील हुसेन मदारी म्हणाले खर्डा येथील बाजारतळावर गेल्या 50 वर्षांपासून अनेक गरीब मदारी समाज बांधव गोधडीचे पाल टाकून राहत आहेत. त्यांना आणि त्यांच्या मुला बाळांना अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस, वादळ अशा संकटात जीव मुठीत धरून राहावे लागते. कचरा आणि भंगार गोळा करून कशी बशी आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवितात. वन्य जीव संरक्षक कायद्यातील जाचक अटीमुळे माकड आणि सापाचा खेळ करण्याचा पारंपरिक व्यवसाय अनेक वर्षांपासून बंद आहे.
No comments:
Post a Comment