जुन्या वादातून मित्रांनीच केली मित्रांची हत्या; त्यानंतर केलं असं...
बल्लारपूर येथील केजीएन शाळेजवळ जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची दगड आणि धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. बुधवार (ता. ४) व गुरुवार (ता. १५) दरम्यानच्या रात्री दोन वाजता ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव दीपक कैथवास (वय १९) असून तो शहरातील रवींद्रनगर वस्तीतील राहणारा आहे. या प्रकरणातील चारही आरोपींनी आज गुरुवारी सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्या कबुली दिली.
अर्जुन राजू कैथवास (वय २८), गौरव राजू लिडबे (२२), प्रथम शंकर पाटील (२५, तिघेही रा. मौलाना आझाद वॅार्ड, बल्लारपूर), आणि अमन दुखशौर कैथवास (२०, रा. बुद्ध नगरवार्ड) अशी आरोपींची नावे आहेत.
ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील यांच्या निरीक्षणात सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहे.
मृत दीपक आणि चारही आरोपींमध्ये जुना वाद होता. घटनेपूर्वी काल बुधवारी सायंकाळी दीपकचा मित्र भुऱ्या आणि आरोपी अर्जुन यांच्यात वाद आणि शाब्दिक बाचाबाची झाली. या वादानंतर दीपक, त्याचा मित्र भुऱ्या आणि अर्जुन निघून गेले.
मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दीपक हा केजीएन शाळेजवळ एकटा असल्याची माहिती अर्जुनला मिळाली. त्याने प्रथम, गौरव आणि अमन यांच्यासोबत केजीएन शाळा गाठली. तिथे दीपक एकटाच असल्याची संधी साधून चौघांनीही दगड, धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.
हे हत्याकांड घडल्यानंतर अर्जुन, प्रथम, गौरव आणि अमन या चौघांनीही आज गुरुवारी सकाळी पोलिस ठाणे गाठले. तेथे त्यांनी हत्येची कबुली दिली. चारही आरोपींना हत्येच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे.
No comments:
Post a Comment