17 जाने. 2001 कोठेवाडी (पाथर्डी) बलात्कार प्रकरण...
5 आरोपींची जन्मठेप कायम..; बलात्कारीत 8 आरोपींचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा.
‘मोक्का’ला धक्का !
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील कोठेवाडी गावात वीस वर्षापूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेनंतर पुरोगामी महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात होते. न्यायालयाने यातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षाही सुनावल्याने अटक करण्यात आलेले आरोपी शिक्षा भोगत आहेत. मध्यरात्री साडेतीन वाजता ही घटना घडली. दहा ते पंधरा जणांनी गावात दरोडा टाकला. त्यात त्यांनी दागिने लुटले. शिवाय गावातील वयोवृद्ध माहिलांवर बलात्कारही केला होता. या घटनेने महाराष्ट्रात एकच हलकल्लोळ माजला. सामाजिक स्तरावर अत्याचार झालेल्या महिलांना उजळ माथ्याने फिरणे अवघड झाले. दरोडयाच्या उद्देशाने आलेल्या या दरोडेखोरांनी केलेल्या या कृत्याचा तपास पाथर्डीचे पोलिसांनी केला असता त्यांना महिलांवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या पोलिसांनी वैयक्तिक बलात्कार, सामुहिक बलात्कार आणि अन्य गुन्ह्यांखाली या आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले. कोपर्डीच्या घटनेत सामाजिक संघटनांच्या रेटयामुळे पोलिसांवर दबाव वाढला, त्यांनी योग्य दिशेने तपास करीत आरोपींना पकडलेच, शिवाय त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले. पोलिसांनी आरोपींनी संघटीत गुन्हा केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे सादर न केल्याने औरंगाबाद खंडपीठाने यातील आरोपींचा मोक्का रद्द केला आहे. जर पोलिसांनी एखाद्या घटनेचा छडा लावण्याचे ठरवले तर कठीण नाही. हे कोठेवाडी येथील घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. पण औरंगाबाद खंडपीठाने या आरोपींना लावलेल्या मोक्का रद्द करणे हा पोलिस प्रशासनाला मात्र धक्का आहे.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 17 जानेवारी 2001 ला नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणातील 12 आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ‘मोक्का’ लावण्याचा निर्णय रद्द करून पोलीस प्रशासनाने लावलेल्या ‘मोक्का’ला धक्का दिला आहे. मोक्का कायद्यातून या आरोपींची सुटका करून आरोपींनी भरलेल्या दंडाची रक्कम परत करावी तसेच त्यांचे गुन्ह्यातील शिक्षा संपली असेल तर या 12 ही आरोपींना तुरुंगातून सोडण्यात यावे असा आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. पोलीस प्रशासनाने आरोपींविरुद्ध लावलेला संघटीत गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही हे पोलीस यंत्रणेचे मोठे अपयश असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या या बलात्कार प्रकरणातील आरोपी आता तुरुंगातून येवून उजळ माथ्याने वावरणार असतील तर ते चिंताजनक आहे असे म्हणावे लागेल.
17 जानेवारी 2001 ची ती दुर्दैवी रात्र नगर जिल्ह्याच नव्हे तर राज्यही कधी विसरणार नाही. पाथर्डीतील कोठेवाडीतील एका वस्तीवर दहा ते पंधरा आरोपींनी वस्तीवर दरोडा घालून जबर मारहाण करीत चार महिलांवर अमानुषपणे बलात्कार केला होता. वृद्ध स्त्रियांवर बलात्कार करताना या क्रुरकर्म्याना जराही लाज वाटली नाही.अहमदनगर पोलिसांनी या आरोपींना गजाआड केल्यानंतर अहमदनगरच्या तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश ज्योती फणसाळकर(जोशी) यांनी सर्व 12 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकाला 10 लाखाचा दंड सुनावला होता. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. 3 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी या आरोपींना मोक्का कायद्यातील कलमे लागू पडत नसल्याचे स्पष्ट करत कायद्याचे व्याख्येनुसार या आरोपींचा गुन्हा संघटित असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही असा निकाल दिला आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींनी 10 वर्षाच्या काळात संघटितपणे दरोडे ,बलात्कार सामुहिक, बलात्कार केल्याचे पोलिसांचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने या आरोपींना मोक्का लावण्याचा प्रस्ताव मंजूर करून गुन्हा दाखल केला होता. यावर औरंगाबादच्या विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मोक्का कायद्याच्या कलमानुसार 13 आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. ती आज उच्च न्यायालयाने आता रद्द केली आहे. यातील ज्या आरोपींना कोठेवाडी प्रकरणात आधीच जन्मठेपेची शिक्षा झाली आहे ती मात्र कायम राहणार आहे.
No comments:
Post a Comment