दुचाकीस्वारांना मारहाण करून लुटणाऱ्या, तिघांना अटक.
डोंबिवली : रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करून त्यांना लुटून मुद्देमालासह दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. प्रेमकुमार गोस्वामी, सुरज विश्वकर्मा, नाबीर शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण पूर्व भागात राहणारे भीम सिंग (वय ३६) हे गेल्या महिन्यात कल्याण पूर्व भागातून मलंग गड रस्त्याने दुचाकीवरून रात्रीच्या वेळेस चालले होते. काकाच्या ढाब्याजवळ त्यांची दुचाकी आली असता तेथे तिघांनी भीम सिंग यांच्या डोक्यात काठीने जोरात फटका मारून त्यांना दुचाकीवरून खाली पाडले. त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील पैसे, मोबाईल, स्कूटर घेऊन चोरटे पळून गेले. याप्रकरणी भीम यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अशीच घटना रविवारी शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवरजवळील देशमुख होम्स भागात घडली होती. अंकलेश चौधरी (वय ३५) हे रात्रीच्या वेळेत दुचाकीवरून टाटा नाका भागातून चालले होते. त्या वेळी तिघांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील स्कूटर, पैसे लुटून नेले होते.
कल्याण गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. दोन्ही घटना घडल्या तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यांना दोन्ही घटनांमधील तीन संशयित व्यक्ती सारख्याच असल्याचे आढळून आले. त्यानुसार कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ही कारवाई करून आरोपींना मोहने, आंबिवली, उल्हासनगर येथून अटक केली
No comments:
Post a Comment