12 जणांच्या सशस्त्र हल्ल्यात तरुणाचा मृत्यू.
संशयास्पद वाहन अडवल्याने या आणि इतर वाहनांतील १० ते १२ जणांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना किनवट तालुक्यातील इस्लापूरजवळ सोमवारी (१९ जून) रात्री घडली. यात ६ जण जखमी झाले. याप्रकरणी इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर रापेल्ली असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर शिवणी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
किनवट तालुक्याच्या चिखली येथील व्यावसायिक सोपान रेड्डी पेंटेवार (३०) यांनी पोलिसांत तक्रार दिली. यात म्हटले अाहे की, पेंटेवार व त्यांचे सहकारी जीपने सोमवारी दुपारी तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील चातारा येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सोपान रेड्डी व त्यांचे सहकारी चिखली गावाकडे परत येत असताना अप्पारावपेट जवळील कुंटाला-मलकजाम रस्त्यावर एक पिकअप वाहन भरधाव वेगात जात असल्याचे पेंटेवार यांना दिसले.
या वाहनाबाबत शंका आल्याने पेंटेवार यांनी त्यांच्या चालकाला त्या वाहनाचा पाठलाग करायला लावला. जीप रस्त्यात आडवी लावून पिकअप वाहन थांबवून पेंटेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिकअप वाहनचालकाला हटकले. त्याचवेळी वाहनात पाठीमागे बसलेले १० ते १२ जण खाली उतरले. त्यांना वाहनात काय आहे विचारले असता त्यांनी काही वाटल्यास चेक करा, असे म्हणाले. या वेळी पेंटेवार यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी खाली उतरले असता याचदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सोपान रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांवर लाठ्या काठ्या तसेच धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शेखर रापेल्ली गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
No comments:
Post a Comment