नगर जिल्ह्याच्या नामांतराचे स्वागत: पण जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणाले..
अहमदनगर - अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या नामांतराचे स्वागत केले. परंतु, जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर त्यांनी असहमती दर्शवून राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचा समप्रमाणात विकास व्हावा, अशी भूमिका आमदार पवार यांनी मांडली. शासकीय विश्रामगृह येथे आमदार पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, आम्ही नगरच्या नामांतर प्रक्रियेचे स्वागत केले. पण विकासही झाला पाहिजे.
घर चालवण्यासाठी चार पैसे हवेत रोजगार हवा केवळ भावनिक करून चालत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. कालच्या चौंडी येथील कार्यक्रमात सरकारकडून धनगर आरक्षणाबाबत बोलणे अपेक्षित होते. ज्या नेत्यांनी 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती, त्यांचेच डबल इंजिन सरकार आहे. केंद्रात त्यांचे मोठे इंजिन असले तरी आरक्षणाला ते मान्यता देत नाहीत. तमाम धनगर समाज बांधव आस लावून होते पण आरक्षणाबाबत घोषणा न झाल्याने धनगर समाज बांधव नाराज झाले आहेत. भाजप केवळ शाब्दिक खेळ करत आहे, असे पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment