जळगाव - पत्नीला घेऊन कामावर सोडण्यासाठी दुचाकीने पती निघाला. मात्र, काळाने कूस बसलली आणि त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने उडवले. त्यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे. हा अपघात शनिवारी दुपारी बांभोरी गावाजवळ घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
अपघातामुळे काही वेळ वाहतूकही ठप्प झाली हाेती. हेमंत काशिनाथ चौधरी (वय ५०, रा. खोटेनगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. ते त्यांच्या पत्नी माधवी यांना जैन इरिगेशन कंपनीत कामावर सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. जखमी महिलेस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हेमंत चौधरी हे पोलनपेठेतील मेडीकल डिस्ट्रीब्युटरमध्ये कामाला आहेत. त्यांच्या पत्नी माधवी बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत कामावर आहेत. शनिवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ते पत्नीला कामावर सोडण्यासाठी जैन कंपनी जवळून जाताना महामार्गावर धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौधरी दांपत्य हे दुचाकीसह महामार्गाच्या खाली फेकले गेले. त्यात दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थ व तरुणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान हेमंत चौधरी यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अपघात घडल्यानंतर मात्र संबंधित वाहनासह त्यावरील चालक पसार झाला आहे.
No comments:
Post a Comment