अहमदनगर भाजपमधील अंतर्गत वाद; जयंत पाटील म्हणाले भाजपमधील निष्ठावंतांना..
अहमदनगर - भाजपमध्ये निष्ठावानांना डावलण्याचे काम सुरू आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना पहिल्या रांगेत बसवले जाते, पण निष्ठावंतांना भाजपात स्थान नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपमधील अंतर्गत वादावर बोलताना लगावला. तसेच मविआतील जागा वाटपाबाबत अद्याप तीन पक्षांची बैठक झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसची नऊ जूनला नगरमध्ये मोठी सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा व मैदानाची पाहणी करण्यासाठी पाटील शुक्रवारी (ता. 26) नगर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, तसेच आमदार व माजी आमदारांसमवेतही चर्चा केली.
गेला काही दिवसांपासून भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून, नगर जिल्ह्यामध्ये शिंदे व विखे यांच्यातील अंतर्गत धूसफूस लपून राहिलेली नाही. त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले, भाजपमध्ये निष्ठावानांना डावलले जात असल्याचा टोला लगावला. तसेच केंद्राकडून राज्याचे अधिकार गोठवण्याचे काम अप्रत्यक्षपणे सुरू आहे. केंद्राने आणलेल्या नवीन अध्यादेशासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्व राज्यात जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार किरण लहामटे, आमदार नीलेश लंके, माजी आमदार दादा कळमकर, पांडुरंग अभंग, अविनाश आदिक, घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment