कठडा नसलेल्या पुलावरुन कार नदीत कोसळून 3 ठार, 7 जखमी.
मालेगाव - जालन्याहून विवाह सोहळा आटोपून मालेगावकडे परतणाऱ्या मन्सुरी कुटुंबीयांची मारुती इको पांझण नदीवरील कठडा नसलेल्या साधारण ३० फूट उंच पुलावरून थेट कोरड्या नदीपात्रात कोसळली. मालेगाव-नांदगाव रस्त्यावरील नाग्यासाक्या धरणाजवळ मध्यरात्री एक वाजता चालकाला डुलकी लागल्यामुळे झालेल्याया अपघातात तिघे जागीच ठार झाले. त्यात एका चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मालेगावचे डाॅ. याकूब रमजान मन्सुरी यांचा समावेश आहे. मृत व जखमी मालेगाव तसेच भगूर येथील रहिवासी आहेत.
ग्रीन पार्क भागात राहणारे डाॅ. याकूब मन्सुरी व भगूर येथील त्यांचे शालक अफराेज मन्सुरी हे नातेवाईकाच्या विवाहासाठी कुटुंबीयांसह सोमवारी सकाळी जालन्याला गेले हाेते. विवाह आटोपून हे सर्व १० जण मारुती इको गाडीने मालेगावला परतत हाेते. यावेळी याकूब मन्सुरी गाडी चालवत हाेते. गाडी पांझण नदीवरील पुलावर येताच डुलकी लागल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि कठडे नसलेल्या पुलावरून मारुती इको ३० फुटावरून नदीपात्रात कोसळली.
याकूब रमजान मन्सुरी(५०, रा. सायने बुद्रुक मालेगाव), अफरोज अब्दुल लतीफ मन्सुरी (३५ रा. भगूर), शिफा वसीम मन्सुरी (४, रा. भगूर) यांचा मृत्यू झाला. नजमा मन्सुरी (४५), अयान याकूब मन्सुरी (२५), वसिम अक्रम मन्सुरी (३५), मिस्बा मन्सुरी (३०), सारा मन्सुरी(३), अबूजर याकूब मन्सुरी (२३) व वसीम अब्दुल लतीफ मन्सुरी (३५) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी पाेहाेचून जखमींना रुग्णालयात हलविले. तिघा जखमींवर मालेगावात उपचार सुरू आहेत. इतर पाच जणांना नाशिकला पाठवण्यात आले आहे. नांदगावला शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
No comments:
Post a Comment