५० हजार रुपयांची लाच घेताना मनपाचा अधिकारी जाळ्यात.
छत्रपती संभाजीनगर - जमिनीच्या मोबदल्याचा ५६ लाखांचा धनादेश देण्यासाठी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ५० हजार रुपये घेताना मनपाचा नगररचना विभागातील सहायक विशेष भूसंपादन अधिकारी विनोद मोतीराम पंडित (३६) याला एसीबीने सोमवारी अटक केली.
४८ वर्षीय महिला तक्रारदाराच्या पतीने जमीन खरेदी करून त्यावर बांधलेल्या १५ गाळ्यांपैकी ८ गाळे मनपा प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाच्या वेळी २००८ मध्ये जमीनदोस्त केले होते. त्याविरोधात तक्रारदाराच्या पतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देऊन जमिनीचा दीड कोटी मोबदला देण्यासह मागील १६ वर्षांचे व्याजही देण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होते.
या प्रकरणात पहिला ५६ लाखांचा धनादेश पालिकेच्या विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयात आला होता. तो देण्यासाठी पंडित टाळाटाळ करत होता. पुढील रक्कम देण्यासाठी आणखी ५ ते ७ वर्षांचा कालावधी लागेल, असे तो सांगत होता. हे टाळण्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील, त्यापैकी ५० हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून द्यावे, अशी मागणी पंडित याने केली.
तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. ५० हजारांची लाच घेताना पंडितला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या पथकाने पार पाडली.
No comments:
Post a Comment