अहमदनगर : घरच्यांचा विरोध डावलून आपल्याशी लग्न कर असा तगादा लावत वारंवार फोन करुन मानसिक त्रास दिल्याने एका १७ वर्षिय युवतीने कडुलिंबाच्या झाडास दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात घडली. याप्रकरणी युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवानी पदू भोसले (वय १७, रा.वाळुंज, ता.नगर) असे मयत युवतीने नाव आहे. याबाबत तिचे वडील पदू भाना भोसले यांनी मंगळवारी (दि.१७) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसले यांची मुलगी शिवानी हिने शनिवारी (दि.१४) सकाळी ६ वाजण्यापुर्वी वाळुंज शिवारात गुगळे यांच्या पडीक जमीनीच्या बांधालगत असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत प्रारंभी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तिच्या आई-वडीलांचे जबाब नोंदवले. त्यावेळी तिच्या वडीलांनी तिच्या आत्महत्येमागील कारण पोलिसांना सांगितले. मयत शिवानी हिचे रियाज झारकन चव्हाण (रा.येवला, जि.नाशिक) या युवकाशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तो तिला वारंवार फोन करुन तिच्याशी लग्नासाठी तगादा लावला. ही बाब सदर युवतीने आईवडीलांना सांगितली. त्यावेळी तिच्या वडीलांनी ‘‘तुझे वय १८ वर्षे पूर्ण झालेले नाही त्यामुळे काही दिवस थांब त्यानंतर आपण तुझे लग्न लावून देवू’’, असे सांगितले.
ही बाब मयत शिवानीने रियाज चव्हाण यास फोन करुन सांगितल्यानंतर त्याने तिला आई-वडीलांचा विरोध डावलून माझ्याशी लग्न कर, असा वारंवार फोन करुन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केली, अशी फिर्याद मयत शिवानी हिच्या वडीलांनी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी रियाज चव्हाण विरुद्ध भा.दं.वि.क. ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment