विजेचा शॉक लागून या गावात झाला शेतकऱ्याचा मृत्यू.
भौरद गावात पहाटे शेतात एका शेतकर्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करत असताना विद्युत बोर्डमध्ये बिघाड झाला अन् ही दुर्घटना घडली. राजेश वासुदेव चांदूरकर वय 42 वर्ष असे मृत शेतकर्याचे नाव आहे. मुख्य म्हणजे मृतक राजेश चांदूरकर आई-वडिलांसह दोन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कारण त्यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन झाले होते. घरातील दोघेही कर्ते व्यक्ती गेल्याने चांदूरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या संदर्भात प्राप्त माहितीनुसार, राजेश चांदूरकर हे दररोजप्रमाणे पहाटे पाच वाजता शेतात गेले. आणि गव्हाला पाणी देण्यासाठी पाण्याचा मोटर पंप सुरू केला. परंतू मोटर सुरू झाली नाही. मोटर पाहण्यासाठी राजेश विद्युत बोर्डाजवळ गेले. विद्युत बोर्डाची पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला अन् त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला.
या घटनेत राजेश चांदूरकर यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गावकर्यांसह कुटुंबियांना समजतात त्यांनीही शेतात धाव घेतली, याशिवाय डाबकी रोड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी डाबकी रोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा अन् लहान भावाचे कुटुंब आहे.
No comments:
Post a Comment