मराठा समाज्याची वंशावळ हस्तलिखित स्वरूपात पाहता येणार.
नगर जिल्ह्यातील 7 हजार मराठा कुटुंबीयांचा इतिहास ब्रह्मभट कुटुंबियांकडून जतन.
अहमदनगर - नगर जिल्ह्यातील जवळपास 7 हजार मराठा समाजातील घराण्यांचा संपूर्ण इतिहास राजस्थानातील भट परिवाराने 300 वर्षांपासून जतन केला आहे. आता ही वंशावळ एकत्रितपणे हस्तलिखित स्वरूपात लवकरच सर्वाना पाहता येणार आहे. याच परिवारातील विजयकुमार ब्रम्हभट व गौरीशंकरब्रम्हभट सध्या नगर येथे आले आहेत. गावोगावी फिरून या परिवारातील जुन्या लोकांनी ही वंशावळ तयार केली आहे. हा त्यांचा आता पिढीजात व्यवसाय बनला आहे.
वंशावळीत आपले गोत्र, देवक, मुगाव, कुलदेवता याची माहिती असणार आहे. राहुरीचे तनपुरे, अकोलेचे वाठचौरे, पाथर्डीचे लवांडे, आठरे, शेगावचे घुले, पारनेरचे ओटी, सामनेरचे थोरात, कडलग, वाळकीचे भारसिंग, बोठे अशा जवळपास नगर जिल्ह्यातील 7 हजार मराठासमाजातील घराण्यांचा इतिहास जतन करण्यात आला आहे. राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किसनगढ येथील भट (महाराष्ट्रात त्यांना भाट म्हणतात) या परिवाराने इतिहास जतन केला आहे. सुमारे 1 हजार 734 पासून म्हणजे पेशवेकालीन मराठा घराण्यांचा अभ्यास या परिवाराकडे पहावयास मिळत आहे.
राज्यातील पवार, चव्हाण, परिहार, सोलंकी, शिंदे, घोरपडे, भोसले, यादव, जाधव या घराण्याचे राजस्थानातील राजपूत घराण्यांशी - संबंध होते. या घराण्यांची माहिती जमा करता करता महाराष्ट्रातील सर्व मराठा व इतर जातींमधील घराण्यांचीमाहिती जमा करण्याचा व्यवसाय भट परिवाराने सुरु केला.
ज्या गावात बोलवणे होते त्या गावात या परिवारातील सदस्य जाऊन त्यांची सर्व वंशावळ सांगतात. तसेच घरातील नव्या सदस्यांची माहिती त्यात समाविष्ट करतात. यापरिवाराने जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील मराठा समाजातील घराण्यांची माहिती आपल्याकडे जतन केली आहे. इतर जातीमधील घराण्यांची माहितीही त्यांच्याकडे आहे. या घराण्यातील सर्व वंशज, त्यांचे गोत्र, देवक, कुलदेवता, मूळ गाव, स्थलांतरित झाले असेल तर त्याचे कारण याबाबत सर्व माहिती भट परिवाराने जतन करून ठेवली आहे. पूर्वी याकामाबाबत त्यांना धान्य स्वरूपात लोक दक्षिणा देत आता मात्र लोक देतील ते सेवाभावी वृत्तीने ते स्वीकारत आहेत.
वंशावळ माहितीसाठी जबरदस्ती किंवा मानधन ठरलेले नाही. ज्या घराला त्यांची माहिती जाणून घ्यायची असते ते आदरपूर्वक त्यांचा पाहुणचार करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही माहिती विजयकुमार ब्रह्मभट जिल्ह्यातील एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे देणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना ब्रह्मभट म्हणाले की, आम्ही दर पाच वर्षांनी येतो. जे बोलवतात त्यांची वंशावळ आम्ही सांगतो. नवी माहिती समाविष्ट करतो. आमच्या पूर्वजांनी मोडी लिपीत ही माहिती लिहून ठेवली आहे. आम्ही नव्या पिढीने ही लिपी शिकली आहे. नवीन माहिती आम्ही देवनागरी लिपीत लिहीत आहोत. वंशावळी संरक्षण संस्था राजस्थान ही आमची वेबसाईट आहे. असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment