नेवासाच्या भुमता फूड प्रॉडक्ट्सचा दिल्लीत डंका....
पंतप्रधान यांनी घेतली युवा उद्योजक गणेश शिंदे यांच्या कार्याची दखल !
नेवासा - दिल्लीतील विज्ञानभवनामध्ये उद्यमी भारत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एकविसाव्या शतकातील भारत प्रगतीच्या शिखरावरती पोहोचला आहे. यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या क्षेत्राचे मोठे योगदान आहे व त्याअंतर्गत ग्रामीण भागातील उद्योग धारकांची संख्या अधिक आहे. देशातील युवकांनी व्यवसाय क्षेत्रात उतरत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य करावे आणि स्वावलंबी व्हावं असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार मिळवून देणं हे जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी मंडळ यांचे प्रथम उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील अनेक युवक विविध योजनांचा लाभ घेत आपला व्यवसाय करत असतात. अशाच योजनेचा लाभ घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील खरवंडी येथील सुपुत्र गणेश सुनील शिंदे यांनी उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून देशातील २२ उद्योजकांपैकी पहिल्या तीन मध्ये निवड होऊन महाराष्ट्रातुन प्रथम येण्याचा मान देखील मिळवला
जिल्हा उद्योग केंद्र व खादी मंडळ, अहमदनगर यांच्यामार्फत उद्यमी भारत या कार्यक्रमामध्ये प्रवेशाकरिता संपूर्ण प्रक्रिया पार पडली, त्यानंतर अनेक स्पर्धात्मक परीक्षा व खडतर मुलाखतीमधून गणेश सुनील शिंदे यांची निवड उद्यमी भारत या कार्यक्रमासाठी झाली. त्यांच्या समवेत खादी व ग्रामोद्योग मंडळाचे नोडल अधिकारी श्री. बाळासाहेब मुंडे यांची देखील निवड झाली. त्यानंतर ३०जुलैला नवी दिल्लीतील विज्ञानभवनात उद्यमी भारत हा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उद्यमी भारत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खुद्द पंतप्रधान यांनी त्यांच्याशी संभाषण केले. त्यांच्या भूमाता फूड प्रॉडक्ट या व्यवसायाबद्दल पंतप्रधान यांनी माहिती जाणून घेतली. व्यवसायात येणाऱ्या अडचणी, व्यवसाय करण्यासाठीच्या उपाय योजना आणि पुढील काळात लागणारी मदत याबद्दलही विशेष चर्चा झाली व तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले.
युवा उद्योजक गणेश सुनील शिंदे यांच्या भुमाता फूड प्रॉडक्टस हे कंपनीमध्ये उत्कृष्ट फॉर्मुलेशन तसेच जागतिक दर्जाची पॅकेजिंग करून लहान मुलांचा आहार म्हणून वापरले जाणारे नाचणी सत्व, सर्व वयोगटातील लोकांसाठी वापरले जाणारे नाचणी बिस्किट ,गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी शतावरीयुक्त नाचणी बिस्कीट आणि शतावरी युक्त फूड सप्लीमेंट, तसेच नैसर्गिक स्रोत असलेले पौष्टिक प्रोटीन पावडर व पौष्टिक बिस्किट अशी लहान बालक आणि गरोदर व स्तनदा माता यांच्यामधील गरजेच्या जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठीची उत्पादने तयार केली जातात. तसेच त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्र तसेच काही इतर राज्य त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अंतर्गत, पंचायत समितीचे अंतर्गत आणि गाव खेड्यांमध्ये कुपोषण निर्मूलनासाठी या उत्पादनांचा वापर देखील केला जातो. कुपोषण निर्मूलांनामद्धे गणेश सुनील शिंदे यांच्या भूमाता फूड प्रॉडक्टचे खुप महत्त्वाचे योगदान आहे.
त्यांच्या या पोषण युक्त आहारमधील यशस्वी कामगिरीमुळे उद्यमी भारत या कार्यक्रमात त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळानी केलेल्या सहकार्यातून उत्कृष्ट उद्योजक म्हणून गणेश सुनील शिंदे यांची कामगिरी थेट नवी दिल्लीत पोहचली म्हणून जिल्हा उद्योग केंद्र नगर येथे महाव्यवस्थापक श्री.अतुल दवंगे याच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment