किरण काळेंच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ घेतली दखल
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे मनपा आयुक्तांची तक्रार करत जनतेचे सुमारे 4 कोटी 39 लाख रुपये खड्ड्यात घालण्याचा मनपाचा डाव असल्याचे निदर्शनास आणून देत लक्ष वेधले होते. काळे यांच्या या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत काळे यांना ई-मेलद्वारे उत्तर पाठविला असून काळे यांनी केलेला तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी नगर विकास - 2 या विभागाकडे तात्काळ पाठविला असल्याचे कळविले आहे.
महानगरपालिकेने टिळक रोड वरील पुणे एसटी स्टँड ते आनंदऋषीजी समाधीस्थळ पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे व दोन्ही बाजूने आरसीसी गटर करणे यासाठी सुमारे 4 कोटी 39 लाख रुपयांची निविदा नुकतीच काढली आहे. हा रस्ता सुस्थितीत असून देखील या रस्त्याच्या कामासाठी जनतेच्या पैशाची लूट करण्याच्या हेतूने निविदा काढली गेली असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. प्रादेशिक पर्यटन विकास निधी 2021-2022 अंतर्गत आलेल्या निधीतील सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग गैरप्रकारे सुरू असल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. या तक्रारीची गंभीर दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे.
काळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले आहे की, दिवसाढवळ्या जनतेच्या पैशांवर दरोडा घालण्याचे काम मनपा यंत्रणेकडून सुरू आहे. व्यापारी, नगरकर नागरीक बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हवालदिल आहेत. बाजारपेठेत व्यापार्यांचा आक्रोश ऐकण्यासाठी जाण्याची गरज शहराच्या आमदारांना वाटली नाही. मात्र स्वतःच्या घरापासून स्वतःच्या कार्यालयाकडे स्वतःला दररोज ये-जा करावी लागते म्हणून व्यापार्यांकडे दुर्लक्ष करणार्या आमदारांनी स्वतःच्या गरजेचा रस्ता चांगला असुन देखिल तो विमानाच्या धावपट्टी सारखा चकचकीत करण्याला प्राधान्य दिले आहे. हे दुर्दैवी असल्याची टीका किरण काळे यांनी आ. संग्राम जगताप यांच्यावर केली आहे. आमदारांना जरी बाजारपेठेची काळजी नसली तरी काँग्रेसला ती आहे, असे सांगायला देखिल काळे विसरलेले नाहीत. काँग्रेसच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतल्यामुळे ही लूट होऊ नये यासाठी आळा बसेल, असा आशावाद काळे यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment