शिवजयंती उत्साहात साजरी.
जय भवानी...जय शिवाजीच्या घोषणा; शिवप्रेमींमध्ये अमाप उत्साह.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे,उपमहापौर गणेश भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे,उपआयुक्त श्रीनिवास कुरे, प्रांतअधिकारी श्रीनिवास पाटील, संजय भोर, अॅड.शिवाजी कराळे तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जय भवानी.. जय शिवाजी.. चा जयघोष.. शहरातील प्रमुख चौकात भगव्या झेंड्याचा झंझावत.. डिजेवर शिवरायांची गाथा सांगणारे गाणे.. पोवाडे. अशा वातावरणात नगर शहरात आज मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नगर शहरात ठिकठिकाणी ढोल ताशाच्या गजरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
सर्व जाती धर्मांना सामावून घेत रयतेचे राज्य निर्माण करणारे राजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यांच्या जीवन संघर्षाची गाथा आजच्या काळासाठी नव्हे तर भविष्यातील पिढ्यांसाठी देखील प्रेरणादायी आहे.आजच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते.विदेशात असलेला मराठी माणूसही आपल्या राजाची जयंती धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरी करतो. मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी होत आहे. पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. सोशल मीडिया शिवमय झाला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराजांना मानवंदना देण्यात येत आहे. देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. राज्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी या उत्सवातून सामाजिक भान जपलं जातं. महाराजांच्या उंचच उंच मूर्तीची पुजा होते, अश्वारुढ पुतळ्यांच मिरवणूकही निघते. तर, अनेक कलाकार आपल्या कलेतून महाराजांची प्रतिमा साकारतात. महाराजांना देशभरातून अभिवादन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त मोदींनी ट्विट करुन अभिवादन केलंय, तसेच शिवाजी महाराज हे महान महानायक आणि भारताचा गौरव असल्याचं मोदींनी म्हटलंय. ठाणे-दिवा खंडावरील दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांचे उद्घाटन केल्यानंतर आणि नवीन उपनगरीय रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर शुक्रवारी ते बोलत होते. मोदींनी ट्विट करुनही, ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असे मोदींनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जुने बसस्थानक येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास आमदार जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, संजीव भोर, अॅड. शिवाजी कराळे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, निलेश इंगळे, अजय दिघे, गणेश बोरुडे, सागर गुंजाळ, नैना शेलार, सुप्रिया काळे, सुजाता दिवटे, योगीता कुडीयाल, साधना बोरुडे, दिपक बडदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते यांनी स्वराज्य सहजा-सहजी मिळाले नाही, स्वराज्यासाठी अनेकांचा त्याग व बलिदान आहे. ही जाणीव ठेऊन महाराजांचे मावळे या नात्याने त्यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. महाराजांचे शौर्य, माणुसकी, रणनिती व प्रजेसाठी असणारे प्रेम त्यांचे कार्य व विचार आज प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment