विधान भवनाकडे आत्मदहनासाठी निघालेल्या 26 आंदोलक शिक्षकांना अटक
मुंबईच्या आझाद मैदानात शिक्षकांचे आंदोलन पेटले, पोलिस आंदोलकांमध्ये बाचाबाची.
जुनी पेन्शन मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात तसेच पेन्शन नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतून बहुसंख्य शिक्षक मयत झाले आहेत. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी तसेच मयत शिक्षकांच्या पाल्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आझाद मैदानावर दि.23 डिसेंबर पासून महाविश्वास धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शिक्षकांनी मुंडन करुन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला होता. तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल आंदोलक मोर्चाने विधानभवनाकडे सामुदायिक आत्मदहनासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना अटक केल्याने पुढील अनर्थ टळला.
राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानात जुनी पेन्शन फोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सामुदायिक आत्मदहनसाठी सोमवारी (दि.27 डिसेंबर) विधानभवनाकडे आंदोलकांनी कूच केली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवून संघटनेच्या प्रमुख नेत्यांसह आंदोलक शिक्षकांना अटक केली. यावेळी आंदोलकांमध्ये उद्रेक होऊन पोलिसांसह बाचाबाची झाली. आंदोलक नेत्यांनी जुनी पेन्शन मिळत नाही, तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. राज्यातील शिक्षक हजारोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले असून, हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरुन शिक्षक, शिक्षकेतरांना जुनी पेन्शनचा लाभ देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
कोरोना काळात तसेच पेंशन नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतून बहुसंख्य शिक्षक मयत झाले आहेत. अशा शिक्षकांचे कुटुंब उघड्यावर आले असून, शासनाने त्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करण्याची गरज आहे. मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरुन नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू होणे हा त्यांचा संविधानिक हक्क आहे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने संघर्ष सुरु असून, हा प्रश्न सुटन नाही, तो पर्यंत सर्व आंदोलक शिक्षक मुंबई सोडणार नाही असे जुनी पेन्शन फोर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे यांनी म्हटले आहे.
एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणांनी परिसर दणाणले. यामध्ये संघटनेच्या अध्यक्षा संगीता शिंदे, सचिव महेंद्र हिंगे, सरचिटणीस दिलीप डोंगरे, श्रीधर गोंधळी, संभाजी पाटील, राजू पठाण, रवींद्र पाटील, अजित गणाचारी, चित्रा जोशी, सलमा शेख, नंदा डूबरे, रावसाहेब गीते, गिरासे इंद्रसिंग, विजय कोंडूस्कर, मोईन काझी, कैलास चौधरी, गजानन काटे, राजमोहंमद देसाई, निशिगंधा राऊत, छाया सावंत, मीना गावफले, व्यंकटराव जाधव, बबन शिंदे, संजय कळकुंबे, सिद्दू माचेट्टी, अर्पिता चव्हाण आदी 26 आंदोलकांना अटक करुन मुंबई येथील येलोगेट पोलिस स्टेशनला ठेवण्यात आले होते. संध्याकाळी उशीरा आंदोलकांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात सुनिल दानवे, बद्रीनाथ शिंदे, दिलीप बोठे, व्यंकटराव जाधव, मधुकर घुगे, अण्णासाहेब गायकवाड आदी शिक्षक सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment