नादुरुस्त रोहित्र तातडीने बसवा अन्यथा महावितरणवर मेणबत्ती आंदोलन
पारनेर परिवर्तन व शिवबा संघटनेचा इशारा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरणाचे रोहित्र जळालेले व नादुरूस्त आहेत. यामुळे अनेक शेतकर्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. ही नादुरुस्त रोहित्र महावितरणने तातडीने दुरुस्त करून शेतकर्यांना पूर्ण दाबाने वीज द्यावी अन्यथा महावितरण कार्यालयावर मेणबत्ती आंदोलन करण्यात येईल असा इशारा पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन व शिवबा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये शेतीपंपाची वीज कमी दाबाने मिळत असून शेतकर्यांचे शेतीपंप जळत आहेत. अनेक भागांमध्ये रोहित्राच्या क्षमतेपेक्षा अधिक भाराच्या शेतीपंपाचे कनेक्शन आहेत. त्यामुळे बर्याच ठिकाणी रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक गावांमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रोहित्र नादुरूस्त आहेत. नादुरुस्त रोहित राम मुळे अनेकांना पिण्याच्या पाण्याची व घरातील विजेची अडचण निर्माण झाली आहे. जळालेले रोहित्र बदलण्यासाठी व दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्यांकडून थकीत वीजबिलांची कारणे देत टाळाटाळ होत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीमधील हातातोंडाशी आलेला घास महावितरणच्या रोहित्रा अभावी हिरावून घेतला जात आहे. महावितरणाच्या विरोधात पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशन व शिवबा संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्यावतीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तालुक्यातील सर्व नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलावी अन्यथा पारनेर महावितरण कार्यालयावर लवकरच मेणबत्ती आंदोलन करण्यात येईल असा इशारा पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन भालेकर व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिला आहे.
वीज बिल भरले नसतील तर कारवाई करा, लाईट कट करा परंतु जळालेले रोहित्र बसविणे हे महावितरणचे काम आहे. आणि त्यासाठी जर शेतकर्याच्या बिलातून खर्च करायचा असेल तर मग सरकारची जबाबदारी काय ? कनिष्ठ कर्मचारी शेतकर्यांना अरेरावी करत आहेत. ऊर्जा मंत्र्यांच्या जिल्ह्यात हे सगळे सुरु आहे. विजेच्या समस्येवर पर्याय काढणे हेच अधिकार्यांचे काम आहे. कुठल्या रोहित्रा वर किती लोड आहे ! हे जर अधिकार्यांना कळत नसेल तर मग अभियांत्रिकी पदव्या घेतलेले अधिकारी कशाला हवेत असा असा सवाल परिवर्तन चे अध्यक्ष सचिन भालेकर व शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment