नाव दादा पाटलांचे मात्र कारभार भलताच सुरू - प्रताप शेळके.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बाजार समितीला स्व. दादा पाटील हे नाव द्यायला चाळीस वर्ष लागले. बाजार समितीला त्यांचे नाव देऊन त्यांची स्वप्ने पायदळी तुडविली जात आहेत. इतर सहकारी संस्थांचे जे दुर्दैव झाले ते मार्केट कमिटीचे होऊ नये यासाठी आगामी निवडणुकीत अशा लोकांच्या हाती सत्ता देऊ नये. नाव दादा पाटलांचे मात्र कारभार भलताच सुरू असल्याची टिका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी बाजार समितीच्या नेत्यांवर व संचालक मंडळावर केली आहे.
नगर बाजार समितीला आलेल्या कारणे दाखवा नोटीस संदर्भात नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजीत केली. यावेळी शेळके बोलत होते. शेळके पुढे म्हणाले की, ज्या झाडाच्या फांदीवर बसायचे तीच फांदी तोडायची अशी शेखचिल्ली सारखी यांची गत झाली असून दिसली जमीन की विकली असा कारभार सुरु आहे. दूध संघाची जागा विकली आता बाजार समितीची जागा विकण्याचा डाव सुरु आहे.
बाजार समितीच्या पदाधिकार्यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना संदेश कार्ले म्हणाले की , बाजार समितीमधील ज्या मुद्दयांच्या आधारे नोटीस निघाली त्याला उत्तर देण्याऐवजी व्यक्तिगत टिका केली गेली. आम्ही खालच्या थराचे बोलणार नाहीत. त्यांनी आमच्या निष्ठे विषयी बोलू नये. शिवसेनेत आदेश पाळले जातात. आम्ही गाडे सरांचा आदेश कधीही डावल्ला नाही. आम्ही तक्रारदार असल्यानेच आम्हाला नोटीसा मिळाल्या . आम्ही कधीच सत्तेचा दुरपयोग केला नाही ऊलट भाजपच्या काळात चौकशी झाली त्यांनीच सत्तेचा वापर करीत चौकशी अहवाल दडवुन ठेवला . आम्ही दुरपयोग केला असता तर बाजार समिती केव्हाच बरखास्त झाली असती. बाजार समितीचे निम्मे संचालक आम्हाला येऊन भेटतात आम्ही गरीब आहेत गैरव्यवहाराशी आमचा सबंध नसल्याचे सांगतात. आम्ही कधीच रात्रीच्या वेळी माजी राज्यमंत्री कर्डिले यांना भेटलो नाही ऊलट तुम्हीच बाजार समितीला नोटीस आल्यानंतर अजितदादा पवारांचे पाय धरले अशी टिका कार्ले यांनी केली.
बाळासाहेब हराळ म्हणाले की , मी कोणत्या पक्षात आहे याची काळजी करण्यापेक्षा बाजार समिती पधाधिकार्यांनी आपला पक्ष कोणता हे सांगावे, दिवसभर भाजपात व रात्री हे राष्ट्रवादीत असतात .बाजार समितीत अनधिकृत बांधकामे व गाळे बांधली नाही हे जर सिद्ध झाले नाही तर आम्ही बाजार समिती बिनविरोध त्यांच्या ताब्यात देऊ असे आव्हान त्यांनी दिले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांनी बाजार समितीने कर्मचारी फंड व पदोन्नतीत गैरव्यवहार होत असून कर्मचार्यांना सहा सहा महिने पगार मिळत नसल्याचा आरोप केला.
यावेळी जि.प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे , बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ , माजी संचालक संपतराव म्हस्के, पंचायत समितीचे सभापती संदिप गुंड, माजी सभापती रामदास भोर , उपसभापती दिलीप पवार, माजी उपसभापती रवि भापकर, गुलाब शिंदे , प्रकाश कुलट , भाऊ तापकिर आदी उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment