माहिती गंगा आणि उन्नत चेतनेच्या सहाय्याने सत्यबोधी सूर्यनामा करुन सार्वजनिक बाबतीतील अनागोंदी, भ्रष्टाचार थांबविता येणार ः अॅड. गवळी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अनागोंदी माजविणारे आणि भ्रष्टाचार करणार्यांना उघडे पाडण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सत्यबोधी सुर्यनामा करुन त्यांच्यावर अंकुंश ठेवण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर माहिती गंगा आणि उन्नत चेतनेच्या सहाय्याने सत्यबोधी सुर्यनामा करुन सार्वजनिक बाबतीतील अनागोंदी, भ्रष्टाचार थांबविता येणार असल्याचा विश्वास संघटनांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरासह प्रत्येक छोट्यामोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक जागा आणि सार्वजनिक मालमत्तेवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केल्याचे सर्रास दिसते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार त्याबाबत कायद्याचा वापर करीत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे बेकायदेशीर अतिक्रमणे जनतेला त्रासदायक ठरतात. महापालिका हद्दीतील अनेक अतिक्रमण वर्षानुवर्षे अबाधित आहेत. त्याला कारण महापालिकेचे जबाबदार अधिकारी अशा अतिक्रमण धारकांकडून महिन्याला पाकीट घेऊन संरक्षण देतात. त्याच वेळेला हे अधिकारी लोकप्रतिनिधींना सुद्धा अशा बेकायदेशीर कामांमधून केलेल्या कृतींना संरक्षण मिळण्यासाठी दरमहा नियमितपणे पाकीट पाठवित असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
एकंदरीत भ्रष्टाचार आणि सार्वजनिक कामांबाबतची टोलवाटोलवी याला नोकरशाही आणि लोकप्रतिनिधी सातत्याने संरक्षण देत आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अनागोंदीने थैमान घातला आहे. जनता उघड्या डोळ्यांनी अन्याय सहन करीत आहे. त्यासाठी इंडिया अगेन्स्ट अनागोंदी चळवळीच्या माध्यमातून सत्यबोधी सुर्यनामा सातत्याने सुरू ठेवला जाणार आहे. माहिती गंगा आणि उन्नतचेतनेच्या माध्यमातून अनागोंदी आणि भ्रष्टाचार करणार्या नोकरशाहीला उघडे पाडण्याचा या मागचा प्रमुख उद्देश असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.
No comments:
Post a Comment