तनपुरे साखर कारखाना कामगारांचे उपोषण व धरणे आंदोलन.
थकीत वेतनासाठी कामगार रस्त्यावर..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहुरी ः राहुरी फॅक्टरी येथे डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना आता विखेंच्या ताब्यात आहेत. या कारखान्यातील दोनशे कामगार थकित वेतन व इतर 25 कोटी 36 लाख रुपयांच्या मागणीसाठी उपोषण व धरणे आंदोलन करीत आहेत. आज आंदोलनाचा सातवा दिवस असून राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर एक तास रास्ता रोको करून, कारखान्याचे सर्वेसर्वा खासदार डॉ. सुजय विखे व संचालक मंडळाचा कामगारांनी निषेध केला. रिपाइ (आठवले गट) व शिवसेनेने रास्ता रोकोमध्ये भाग घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी आज सकाळी कामगारांची भेट घेऊन, लेखी प्रस्ताव दिला. त्यात वापरलेल्या जर-तर च्या भाषा होती त्यामुळे संतप्त कामगारांनी प्रस्ताव धुडकावला. आणि कामगारांनी आज दुपारी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.
शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले, तोडगा काढला नाही तर खासदार डॉ. विखे यांच्या घरावर मोर्चा काढू. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व खासदार विखे एकाच माळेचे मणी आहेत. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले, विखेंनी केवळ पैसा खाण्यासाठी व खासदारकी मिळविण्यासाठी कारखाना ताब्यात घेतला. कामगारांना वार्यावर सोडले. उद्यापासून विविध संघटना कामगारांसाठी संघर्ष करतील. असा इशारा रिपाइंचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, बाळासाहेब जाधव, तुषार दिवे, शिवसेनेचे बाबासाहेब मुसमाडे,संतोष चोळके, भागवत मुंगसे, कुमार भिंगारे, ज्ञानेश्वर भागवत आदींनी दिला.
No comments:
Post a Comment