राज्यातील पोलीस प्रशासन सत्ताधार्यांच्या दावणीला! ः चितळे
केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचा भाजपाकडून निषेध...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रातील अनेक नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशनचे व कोर्टाचे उंबरे वर्षानुवर्षे झिजवत आहेत, परंतु त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. राज्यामध्ये खून, दरोडे, बलात्कार, महिलांवरील अत्याचाराचे अनेक गुन्हे प्रलंबित आहेत.त्यातील काही गुन्ह्यांचा तपासात अजीबात प्रगती नाही.अनेक आरोपी मोकाट फिरत आहेत. परंतु या गुन्ह्यांचा तपास लावण्याऐवजी महाराष्ट्र सरकार शुल्लक गोष्टीसाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्यांना हवे तसे वागवून घेत आहेत.राज्यातील पोलीस प्रशासन सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहे. शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो भारत मातेला शिव्या देतो त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस महाराष्ट्र सरकार मध्ये नाही. पण केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अदखलपात्र गुन्हाबाबत त्यांना अटक करून महाविकास आघाडी शासन सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप भाजपा मध्य मंडळ अध्यक्ष अजय चितळे यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे तीव्र पडसाद नगर शहरातही उमटले. भारतीय जनता पार्टीच्या मध्य मंडल अध्यक्ष अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली एसटी स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी तीघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जनता कोरोनाच्या आगीत होरपळत असताना त्यातून जनतेला बाहेर काढण्याच्या ऐवजी महाराष्ट्र सरकार आपली ताकद व प्रशासनाचा वेळ फालतू गोष्टींसाठी खर्च करण्यात गुंतले आहे,असा आरोपही यावेळी करण्यात आला. नारायण राणे यांचे वक्तव्य चुकीचे आहे. परंतु नारायण राणे यांना ज्या पद्धतीने त्रास द्यायचे काम राज्यातील सत्ताधारी पक्ष करीत आहेत, त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी मध्य नगर मंडलाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत असे यावेळी बोलताना अजय चितळे म्हणाले.आंदोलना प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या मध्य मंडलाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment