अमित शहांकडे ‘सहकार’ मंत्रालयाची जबाबदारी...
राष्ट्रवादी’च्या अडचणी वाढणार?
मुंबई - राज्यात सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीचा मोठा दबदबा आहे. साखर कारखाने, सहकारी बँकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतत वर्चस्व राहिले आहे. सहकारातून मोठा विकास साधता येतो हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सहकार हे नव मंत्रालय निर्माण करून गृहमंत्री अमित शहांवर या मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराची मूळ शोधण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केल्यास राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय सहकार खात्याचा कार्यभार अमित शहा यांच्याकडे दिल्यामुळे राज्यात सहकार क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. राज्यामध्ये भाजपला शह देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झाल्यास त्याला केंद्रातील सहकार खात्याच्या माध्यमातून उत्तर दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच, या खात्याच्या मदतीने राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्थांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाच्या शपथविधी आधी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा कार्यभार अमित शहा यांच्याकडे सोपविला. अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभार दिल्याने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असणार्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने अलिकडेच जप्तीची कारवाई केली. या शिवाय इतर 30 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्याची मागणीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. दरम्यान, आता अमित शहा यांच्याकडेच सहकार खात्याचा कार्यभार आल्याने राज्यामध्ये सहकार चळवळीत आघाडीवर असणार्या राष्ट्रवादीला पूर्वीसारखा मुक्त वाव मिळणार नाही हे स्पष्टच आहे.
No comments:
Post a Comment