वाहुन जाणारे पाणी थांबवावे लागेल, वळवावे लागेल.- उध्दव ठाकरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

वाहुन जाणारे पाणी थांबवावे लागेल, वळवावे लागेल.- उध्दव ठाकरे

 वाहुन जाणारे पाणी थांबवावे लागेल, वळवावे लागेल.- उध्दव ठाकरे

डॉ. शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार-2020 चे वितरण...


मुंबई :
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात पाणी पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे,  वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांना देण्यात येणार्‍या डॉ.शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्यातून गोडे पाणी उपलब्ध करणे, तसेच मराठवाडा व विदर्भातील परिसरासाठी पाणी वळवण्याचा पर्याय उपयोगात आणावा लागेल. भावी पिढ्यांसाठी आपल्याला पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. राज्यातील वाया जाणारे पाणी, समुद्राच्या पाण्याचा उपयोग अशा अनेक गोष्टींवर विचार करावा लागेल. इस्त्रायल सारख्या देशात खारे पाणी गोडे करून वापरण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. आपल्याकडेही हे तंत्रज्ञान विकसित करत आहोत. नवीन धरणापेक्षा आहे त्या संसाधनाचे बळकटीकरण करावे लागेल. त्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, शासन राज्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उत्कृष्ट नियोजनाची दूरदृष्टी असलेले दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण हे आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या 101व्या जयंतीनिमित्त आपण जलसंपदा विभागामार्फत हे पुरस्कार देत आहोत. जलसाक्षरता आणि पाण्याचे नियोजन यासाठी जलभूषण पुरस्कार विजेत्यांनी केलेले काम पुढे अनेकांपर्यंत पोहोचावे, त्यातून जलसाक्षरता निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  
दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या शिस्तीचा चांगला परिणाम आज आपण अनुभवतो आहोत. कितीही मोठे शोध लागले, विकास झाला, तरी पाणी निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित होऊ शकलेले नाही. जे काही पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचे नियोजन करावेच लागेल. शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. एकीकडे पाणी कधी मरणोन्मुख माणसाला वाचवते. पण पूर आला, तर तेच पाणी बुडवून टाकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन हे महत्वाचे आहे. हेच नियोजन दिवंगत शंकररावजी यांनी त्या काळी दूरदृष्टीकोनातून केले. त्यांनी जायकवाडी धरणाच्या माध्यमातून एक दिशा दिली. त्यासाठी पाऊलही टाकले असेही ठाकरे म्हणाले.
राज्याच्या जलक्रांतीचे जनक दिवंगत शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जलक्रांतीचे कार्य पुढे नेणार्‍या मान्यवरांचा जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. निश्चितच ध्येयवेड्या जलमित्रांचा, जलक्रांतीसाठी झपाटलेल्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. जलक्रांतीची ही चळवळ झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचवून यास लोकचळवळीचे स्वरुप येवो, अशा अपेक्षा व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी जलसाक्षर होऊया, असे आवाहन केले.
या निमित्त दिवंगत शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करताना त्यांच्या काळात झालेल्या विविध निर्णयांची माहिती देत डॉ.शंकरराव चव्हाण यांची ओळख त्यांच्या ज्ञानातून झाली. साधेपणा, प्रशासनावर पकड, हेडमास्तर अशी ओळख असलेल्या दिवंगत शंकररावजी चव्हाण यांची कारकीर्द संस्मरणीय राहीली, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत, पाणी पुरवठा व स्वच्छता  मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment