उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहणार - ना. थोरात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहणार - ना. थोरात

 उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहणार - ना. थोरात

किरण काळेंच्या पुढाकारातून उद्योजकांच्या प्रश्नांवर पार पडली बैठक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशाची अर्थव्यवस्था विकसित व्हायची असेल तर त्यासाठी औद्योगिकीकरण महत्वाचे आहे. उद्योग हा त्याचा आत्मा आहे. नगर शहरातील उद्योजकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम निश्चितपणे मी करेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉलमध्ये अहमदनगर एमआयडीसी मधील लघु व मोठ्या उद्योजकांची बैठक ना. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.
यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, आ. डॉ. सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, मच्छिंद्र साळुंखे, विशाल घोलप, रावसाहेब काळे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष बैठकीमध्ये उद्योजकांनी अनेक प्रश्न ना. थोरात यांच्या समोर मांडले. ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणा असून एकाच वेळेला दुहेरी कर आकारला जातो. यापैकी एक कर ठेवण्यात यावा अशी मागणी यावेळी उद्योजक यांच्या वतीने करण्यात आली. पाण्याची पाईपलाईन जुनी झाल्याने ती सतत फुटते.  त्याचबरोबर नगर-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज आहे. तसेच एमआयडीसी परिसरामध्ये असणारे ट्रक टर्मिनल मंजूर झाल्यास त्याची उद्योजकांना मदत होईल अशी मागणी यावेळी त्यांनी केली. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या पुणे कार्यालयाला पूर्वी नगर जोडले होते आता ते नाशिक कार्यालयास जोडले जात आहे. किरण काळे यांनी यावेळी नगर पूर्वीप्रमाणेच पुण्यालाच जोडलेले ठेवावे अशी मागणी यावेळी ना. थोरात यांच्याकडे केली. ना. थोरात म्हणाले की, यातील काही मागण्या राज्य स्तरावरील असल्याने शासन म्हणून त्याचा पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी बैठकांचे आयोजन निश्चितपणे केले जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी ज्या त्या विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना करून मार्गी लावण्याचे काम केले जाईल. सर्व संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना उद्योजकांच्या मागण्या संदर्भात मध्ये मी लेखी सूचना करणार असून त्यांचा पाठपुरावा देखील करणार आहे, असे आश्वासन यावेळी ना. थोरात यांनी दिले.
ना. बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही किरण काळे यांच्या हाती शहराची धुरा सोपवली आहे. ते स्वतः एमबीए असून उच्च शिक्षित आहेत. त्यांचा माझ्याकडे नगरच्या उद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सतत पाठपुरावा सुरू असतो. उद्योजकांनी त्यांच्या प्रश्नांसंदर्भात निसंकोचपणे किरण काळे यांच्याशी संपर्क साधावा. तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पाठीशी आहे.

उद्योजकांना काँग्रेस संरक्षण देणार
  नगर शहरातील एमआयडीसी टिकायची असेल, येथील उद्योगधंदे इतरत्र जायचे नसतील आणि शहराच्या एमआयडीसीचे विस्तारीकरण व्हायचे असेल तर उद्योजकांसाठी शांततापूर्ण वातावरण शहरात असणे महत्त्वाचे आहे. अनेक मंडळी विविध माध्यमातून उद्योजकांना उपद्रव करत त्रास देत असतात. अशा त्रास देणार्‍यांपासून उद्योजकांना काँग्रेसच्यावतीने संपूर्ण संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही यावेळी किरण काळे यांनी दिली. यावर उद्योजकांनी टाळ्यांचा कडकडाट करत काळे यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले.

मुंबईत बैठक लावा - काळे
  शहराच्या अर्थचक्राला चालना मिळायची असेल आणि स्थानिकांना अधिकाधिक रोजगार निर्माण व्हायचा असेल तर नगर एमआयडीसीला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य होण्याची गरज आहे. एमआयडीसीचा विकास होण्याची नितांत आवश्यकता आहे. उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत बैठका लावाव्यात अशी मागणी किरण काळे यांनी बैठकीत केली. ना. थोरात यांनी काळे यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुंबईला लवकरच बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही दिली. 


No comments:

Post a Comment