पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिव्यांग पुनर्वसन जिल्हा समिती व दहा वर्ष, रेल्वे सल्लागार समितीवर पाच वर्ष काम असा सामाजिक कार्याचा इतिहास असणार्या अँड लक्ष्मण पोकळे यांनी ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा महापालिकेकडे प्रस्ताव दिला असताना या प्रस्तावाला केराची टोपली दाखवून राजकीय कार्यकर्त्यांची स्वीकृत पदी निवड करण्यात आली. त्या पाच जणांच्या निवडीला अँड पोकळे यांनी याचिका दाखल करून औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले असून या याचिकेची न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला व न्या.आर.एन.लोढा यांच्यासमोर सुनावणी झाली. संबंधितांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी मदन संपत आढाव, संग्राम बबन शेळके, रामदास नानाभाऊ आंधळे, विपुल मूलचंद शेटीया आणि बाबासाहेब गाडळकर यांनी प्रस्ताव दाखल केले होते तत्कालीन जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी हे प्रस्ताव फेटाळले होते. बाबासाहेब गाडळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर राजू आसाराम कातोरे यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रस्ताव पाठविला महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अहर्ता नियुक्त्या) नियम 2012 चे नियम 4 (क) ते 4 (छ) नुसार निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. वैद्यकीय, शिक्षण, सनदी लेखापाल, अभियांत्रिकी, अभिवक्ता, सेवानिवृत्त नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिका उपायुक्त सामाजिक कार्यातील अशासकीय संघटनांचे पदाधिकारी स्वीकृत नगरसेवक होण्यास पात्र आहेत. औरंगाबाद खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली आहे या याचिकेची पुढील सुनावणी 6 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे याचिकाकर्ते पोकळे यांच्या वतीने अॅड अमोल गवळी हे काम पाहत आहेत.
No comments:
Post a Comment