कलेतून लोकशिक्षण देणारे अण्णाभाऊ साठे समाजसुधारक : गायकवाड
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकिरा (कादंबरी) माझी मैना गावाकडे राहिली (लावणी) यासह कथा, लघुकथा ,वगनाट्य, चित्रपट कथा असे साहित्य अजरामर असून ‘जग बदल घालुनी घाव । सांगून गेले मज भीमराव’ या त्यांच्या काव्यपंक्ती आंबेडकरी चळवळीचे महत्त्व सांगणारे आहे. कलेतून लोक शिक्षण देणारे अण्णाभाऊ समाजसुधारक होते असे गौरवोद्गार ओबीसी 12 बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड यांनी काढले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती प्रित्यर्थ येथील सिद्धार्थ नगर चौकातील अण्णाभाऊ यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महासंघाचे संपर्क कार्यालयात अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री.गायकवाड बोलत होते. यावेळी महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल इवळे, महिलाध्यक्षा अनुरिता झगडे, युवाध्यक्ष आर्यन गिरमे, शहराध्यक्ष शामभाऊ औटी, तालुकाध्यक्ष अमोल घोडके ,संदीप सोनवणे, राजेंद्र घोरपडे, सौ वनिता बिडवे, सौ छाया नवले,राजेश सटाणकर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले अण्णाभाऊ हे सामान्य कुटुंबातील होते.मात्र, त्यांनी साहित्य निर्मिती करून देश-परदेशात असामान्य असं नावलौकिक मिळवला. त्यांनी समाजाचं केवळ मनोरंजनच केलं असं नाही, तर कलेतून लोकशिक्षण दिलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांच्या पोवाड्याने उभ्या महाराष्ट्रात अंगार पेटवला होता. त्यांचे साहित्य आजच्या पिढीला हे मार्गदर्शक असेच आहे.
सौ.झगडे, सर्वश्री. इवळे,सटाणकर,गिरमे,औटी यांनीही अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या डाव्या विचारसरणीचा परिचय करून दिला. शेवटी तालुकाध्यक्ष अमोल घोडके यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment